औरंगाबाद पाणी प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाचा ‘जल आक्रोश मोर्चा’; फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निघणार मोर्चा

औरंगाबाद पाणी प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाचा ‘जल आक्रोश मोर्चा’; फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निघणार मोर्चा

औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 23 मे रोजी शहरात भव्य ‘जल आक्रोश मोर्चा’काढण्यात येणार आहे. या मोर्च्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सद्यस्थितीत औरंगाबाद शहरातील अनेक भागात आठ-आठ दिवस पाणी येत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावरून महाविकास आघाडीच्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शहरात 23 मे रोजी संध्याकाळी चार वाजता भव्य असा मोर्चा निघणार आहे. पैठणगेट येथून हा मोर्चा निघणार असून, महापालिका कार्यालयावर धडकणार आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक भागात भाजपकडून बैठका घेतल्या जात आहे. तर भाजपच्या स्थानिक आमदार, नगरसेवक आणि महत्वाच्या नेत्यांना मोर्चा यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या जवाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

येत्या काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. गेली ३० वर्षे महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे पण तरीही पाणी प्रश्न शिवसेनेला मिटवता आला नाही, असा आरोप सतत भाजपकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेला घेरण्यासाठी भाजपने रणनीती आखली असून थेट फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येत आहे. तसेच खुद्द फडणवीस मोर्चात सहभागी होणार असल्याने औरंगाबादचा पाणी प्रश्न राज्याच्या राजकारणात पोहचणार आणि याचा फटका शिवसेनेला बसणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – Heavy Rainfall: केरळमधील ‘या’ सात जिल्ह्यांकरीता हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

First Published on: May 18, 2022 9:26 PM
Exit mobile version