“त्यांच्याकडे पाहून मला…” पंकजा मुंडेंनी राज्य सरकारबाबत व्यक्त केले स्पष्ट मत

“त्यांच्याकडे पाहून मला…” पंकजा मुंडेंनी राज्य सरकारबाबत व्यक्त केले स्पष्ट मत

मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा राजकीय पद्धतीने Active झाल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्रभर शिवशक्ती परिक्रमा दौरा आयोजित केला असून, त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात नाशिकपासून झाली आहे. त्यामुळे त्यांचा हा परिक्रमा दौरा हा फक्त देवदर्शनापुरताच मर्यादित राहणार आहे की? यामधून त्या कोणता राजकीय हेतू देखील साध्य करतील, यांकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. या परिक्रमा दौऱ्यावेळी पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारबाबत आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पंकजा यांना पक्षाकडून डावलले जात असल्याचे बोलले जात असताना त्यांनी आता राज्य सरकारबाबत केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Pankaja Munde expressed a clear opinion about the state government)

हेही वाचा – “जालनाच्या घटनेची कोणी जबाबदारी घेण्यास तयार नाही”, ठाकरेंचा राज्य सरकारवर आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यापैकी तुम्हाला कोणता चेहरा जास्त आश्वासक वाटतो? असा प्रश्न पत्रकारांकडून पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत त्या म्हणाल्या की, “त्यांच्याकडे पाहून मला सध्या फार काही वाटत नाही. मला सगळेजण खूप तणावात दिसतात. कारण सत्तेत आल्यापासून त्यांच्यामागे कोणते ना कोणते प्रश्न सुरू आहेत. महाराष्ट्रात मध्यंतरी पूर आला होता, आता पाणी नाही. अशा समस्या सकारात्मक पद्धतीने सोडवताना मी त्यांना पाहिले नाही. त्यामुळे त्यावर मी काही टिप्पणी करू शकत नाही.” त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या विधानाने स्वतःच्याच पक्षाच्या सरकारला घरचा आहेर दिल्याचे बोलले जात आहे.

तसेच, मी देवेंद्र फडणवीसांबरोबर काम केले आहे. त्यांच्या कामाचा झपाटा मी त्यावेळी पाहिला आहे. अजित पवारांबरोबर काम करण्याचा कधी योग आला नाही. पण नोकरशाहीवर त्यांचा बराच प्रभाव आहे, हे मी प्रसारमाध्यमांमधून पाहिले आहे. ते स्पष्ट बोलतात. एकनाथ शिंदेंबाबत बोलायचे झाले, तर त्यांचे कार्यकर्त्यांशी चांगले संबंध आहेत. ते एकदम शांत स्वभावाचे आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना लळा लावलाय, हे मला ऐकून माहीत आहे, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

मराठवाड्यातील भाजपचे खंबीर नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या पंकजा मुंडे यांचा 2019 मध्ये त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाला होता. त्यानंतर त्या राजकारणापासून काहीशा दूर गेल्याचे दिसून आल्या. मात्र, अशातच मागील दोन महिन्यांपासून सोशल मीडिया, माध्यमे, राजकीय चर्चा यांपासून लांब राहलेल्या पंकजा मुंडे या पुन्हा एकदा राजकीय मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्रभर शिवशिक्ती परिक्रमा यात्रा सुरू केली आहे. या परिक्रमा दौऱ्याला नाशिकपासून सुरूवात झाली आहे.

First Published on: September 4, 2023 7:48 PM
Exit mobile version