सहकाराच्या मुद्द्यावर आज दिल्लीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीच्या पार्श्वभूमीवर बोलताना माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सहकार क्षेत्र अडचणीत असून आजची फडणवीस-शहा यांच्यातील भेट अत्यंत महत्त्वाची आहे, असं म्हटलं आहे. पंकजा मुंडे या तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.
पंकजा मुंडे यांनी आज दिल्लीमध्ये पत्रकर परिषद घेतली. यावेळी त्यांनी फडणवीस-अमित शहा यांच्या भेटीसंदर्भात विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी मला कल्पना नाही, असं म्हटलं. पण कोणी सहकाराच्या विषयावर बोलत असेल तर त्यांचं स्वागत आहे, असं देखील त्या म्हणाल्या. अमित शहा सहकारमंत्री झाल्यापासून माझी आणि त्यांची काही भट झालेली नाही. मला सहकाराचा अधिक अभ्यास नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी काही अभ्यास करुन प्रस्ताव आणले असतील, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
राज्यामध्ये सहकाराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सहकार अडचणीत आहे. बऱ्याच कारखान्यांना दुष्काळामुळे फटका बसला आहे. माझा देखील कारखाना प्रचंड आर्थिक नुकसानीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ऊस गाळप करत असताना शेतीवर आधारीत उद्योगांना वेगळी वागणूक न देता ऊसाचे भाव जसे आपण वाढवतो, तसंच साखरेच्या भावांविषयी निर्णय घेणं, इथेनॉलच्या भावांविषयी निर्णय घेणं गरजेचं आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
तुम्ही जेव्हा कृषीआधारीत इंडस्ट्री चालवता तेव्हा आपण शेतकऱ्यांना समोर ठेवून निर्णय घेतो. पण त्याला त्याच्या उत्पादनातून नफा मिळू शकला नाही तर इंडस्ट्री पूर्णपणे नुकसानीत जाते. आम्ही तेव्हा निर्णय घेतले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी तेव्हा आम्हाला खूप मदत केली. नुकसानीमध्ये जे कारखाने आहेत त्यांच्याबाबतीत भूमिका घेऊन कारखाना चालू राहायला पाहिजे. नुसता निवडणुकांसाठी कारखाना नाही तो शेतकऱ्यांसाठी आहे, असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.
सहकाराच्या मुद्द्यावर राजधानी दिल्लीत आज महत्वाची बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात साखर कारखानदारीचा अनुभव असलेले काही भाजप नेते अमित शहांची भेट घेणार आहेत. हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय महाडिक, राहुल कुल, पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित असणार आहेत.