कोकणात कायमची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न, वीजवाहिन्या भूमिगत करणार; विजय वडेट्टीवारांची माहिती

कोकणात कायमची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न, वीजवाहिन्या भूमिगत करणार; विजय वडेट्टीवारांची माहिती

महाराष्ट्रामध्ये मागील दोन दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पाऊस बरसतो आहे. रत्नागिरी, रायगडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने महापूर आला आहे. महामार्ग व कोकण रेल्वे बंद पडल्याने कोकण ठप्प झाले आहे. चिपळूणमध्ये पुराची भीषण परिस्थिती ओढवली असून संपूर्ण चिपळूण शहर खेर्डी, कळंबस्ते, परिसर पाण्याखाली गेले आहेत. कोकणात, विशेषतः चिपळूणमध्ये प्रत्येक पावसाळ्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आता कोकणात कायमची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न असल्याचे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच कोकणात वीजवाहिन्या भूमिगत करणार असून या कामाला याचवर्षी सुरुवात करण्याचा विश्वास त्यांनी दिला आहे.

आपत्तीबाबत आधीच माहिती मिळावी यासाठी आता नव्या तंत्रज्ञानाची आवश्यकता असल्याने आम्ही नागपूरमध्ये डिजास्टर कमांड कंट्रोल सेंटर उभे करत आहोत. १६०० कोटी रुपये या सेंटरसाठी लागणार असून यातून निश्चित माहिती मिळू शकणार आहे. तसेच कोकणातील परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपयोजना करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अतवृष्टी किंवा वादळ आले, तर कोकणात लगेच वीज खंडित होते. त्यामुळे कोकणात वीजवाहिन्या भूमिगत करण्याचा निर्णय झालेला आहे. दोन हजार कोटी रुपयांच्या या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंजुरी मिळाली आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

कोरोनासारखे संकट असतानाही कोकणासाठी विविध उपाययोजना केल्या पाहिजेत. त्यासाठी आम्ही सुरुवात केली आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत कोकणामध्ये वीजवाहिन्या भूमिगत करण्याच्या निर्णयाला मान्यता दिलेली आहे. जवळपास ३ हजार ८०० कोटींच्या पॅकेजला मान्यता दिली आहे. हे कोकणातील सर्व पाच जिल्ह्यांसाठी मिळून आहे. हे सर्व काम यावर्षी सुरु करू हे मी विश्वासाने सांगतो, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

First Published on: July 23, 2021 5:25 PM
Exit mobile version