… तर, गैरहजर सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार!

… तर, गैरहजर सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार!

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग(प्रातिनिधिक चित्र)

आरोग्य विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना न सांगता कामावर गैरहजर राहणे, कामावर अर्धा दिवस भरणे हे आता महागात पडणार आहे. कारण, हे गैरवर्तन ठरवून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा अध्यादेश या विभागातून काढण्यात आला आहे. त्यानुसार वेळेत कार्यालयात उपस्थित न राहणाऱ्या आणि काम न करणाऱ्यांना आता कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात कर्मचारी कामासाठी उपलब्ध होत नव्हते. यातून कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या आणि अनुपस्थितीसह दौऱ्याच्या घटनाही निदर्शनात आल्या. त्यामुळे राज्य सरकारकडून अध्यादेश काढावा लागला.

गैरवर्तनाला आळा बसण्यासाठी निर्णय

कित्येकदा कर्मचारी अनुपस्थितीसाठी पूर्व परवानगी घेत नसल्याचं समोर आलं आहे. तर, कित्येकजण वरिष्ठांना कोणतीही पूर्वकल्पना न देता मुख्यालय सोडत असल्याचं समोर आलं आहे. दौऱ्यासाठी जातानाही वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेत नसल्याचं राज्य सरकारच्या निदर्शनास आले आहे. कार्यालयीन शिस्त आणि कार्यक्षम प्रशासनाच्या दृष्टीने ही गंभीर बाब असल्याने या गैरवर्तनाला आळा बसवण्यासाठी राज्य सरकारने हा अध्यादेश जारी केला आहे. प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने नेहमी कर्तव्यदक्षता ठेवावी, याकरता तसेच कर्मचाऱ्याने प्रशासकीय नियम न तोडण्याबाबत महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांमध्ये नोंद केली आहे.

सर्व दौऱ्यांची पूर्वकल्पना देणे गरजेचे

कार्यालयात अनुपस्थित राहवयाचे असल्यास कामावरुन जाताना किंवा देश-विदेशातील कार्यालयीन दौऱ्यावर जातानाही वरिष्ठ अधिकराऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असल्याचे नियमात नमूद करण्यात आहे आहे. कर्मचारी किंवा अधिकाऱ्याने नियम भंग केल्याचे नियुक्त अधिकाऱ्यांना निदर्शनास आल्यास एक महिन्याच्या आत संबंधितांना सेवेतून निलंबित करुन त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल. या सूचनांचे काटेकोरपणे पालन न झाल्याचे आढळल्यास त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असं आदेशात म्हटलं आहे.

First Published on: June 27, 2018 11:35 AM
Exit mobile version