मोदी सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारून उद्योगपती मित्रांचा फायदा करून देतायत – नाना पटोले

मोदी सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारून उद्योगपती मित्रांचा फायदा करून देतायत – नाना पटोले

कोरोना लसींचा पुरवठा करण्यास केंद्राची टाळाटाळ नाना पटोले यांचा आरोप

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर दररोज घसरत आहेत. या परिस्थितीत देशात इंधनाच्या दरात कपात करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकार दररोज इंधनाचे दर वाढवत आहे. देशात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. इंधन आणि गॅसचे दर वाढवून मोदी सरकार सर्वसामान्यांची लूट करीत असून उद्योगपती मित्रांचा फायदा करत आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

टिळक भवन येथे माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सर्वसामान्य जनतेचे काही देणे घेणे राहिले नसून सरकार फक्त काही निवडक उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी काम करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर निचांकी पातळीवर आले आहेत पण देशात मात्र दर उच्चांकी पातळीवर गेले आहेत. अनेक भागात पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. सद्याच्या काळात डिझेल २५ रुपये लिटर आणि पेट्रोल ३५ रुपये लिटर विकायला हवे पण सरकार महाग इंधन विकून नफेखोरी करत आहे. केंद्रातील भाजप सरकार याच पद्धतीने काम करत राहिले तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल असे पटोले म्हणाले.

नरेंद्र मोदींनी देशाची संपत्ती विकायला सुरु केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील नफा कमावणारे उद्योग कवडीमोल दराने विकले जात आहेत. ऑगस्ट क्रांती मैदानावर आम्ही मोदी चले जाव चा नारा दिला. देशातील आणि राज्यातील एकाही भाजप नेत्याने किंवा भक्ताने याला विरोध केला नाही. मोदी देश बरबाद करत आहेत हे त्यांनाही आता कळून चुकले आहे. त्यामुळे त्यांच्याही लोकांना मोदी नको आहेत.

राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त असल्याने संविधानिक पेच निर्माण होणार आहे. राज्यपालांनी १२ नामनियुक्त सदस्यांच्या नावाला मंजुरी दिली नाही, पेच निर्माण करून ठेवला आहे. मी विधानसभेचा अध्यक्ष असताना विधिमंडळाच्या समित्या तयार केल्या होत्या. नामनियुक्त सदस्य आल्यावर त्या समित्या पूर्ण होणार होत्या पण अद्याप सदस्यांच्या नावाला मंजुरी मिळाली नसल्याने समित्यावरची पदे रिक्त आहेत. त्यामुळे विधिमंडळ समित्यांचे जे कामकाज सुरु आहे ते संविधानिक आहे की असंविधानिक हा पेच राज्यपालांच्या भूमिकेमुळे निर्माण झाला आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

 

First Published on: February 15, 2021 7:13 PM
Exit mobile version