राजकारण्यांबरोबर पोलिसांवरचाही विश्वास उडाला

राजकारण्यांबरोबर पोलिसांवरचाही विश्वास उडाला

गिरिश बापट

राजकारण्यांबरोबरच पोलिसांवरचाही विश्वास उडाला असून केवळ न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे, असे धक्कादायक वक्तव्य पालकमंत्री गिरीश बापट यांनी राजगुरुनगर येथील न्यायलयात आयोजित कार्यक्रमात केले. याआधीही बापट यांनी अनेकदा अशी धक्कादायक वक्तव्ये करून वाद ओढावून घेतला होता. आता या वक्तव्यानेही बापट पुन्हा वादात सापडण्याची शक्यता आहे.

पालकमंत्री गिरीश बापट हे राजगुरुनगर येथील १० कोटीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाला भेट दिली. खेड तालुका बार असोसिएशनच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. त्यांच्या समवेत आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टेपाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे, राजगुरुनगर बार असोशिअशनचे अध्यक्ष अ‍ॅड.दिलीप करंडे, यांच्यासह मोठ्या संख्येने वकील बांधव उपस्थित होते. कोणतेही काम तत्परतेने होत नाही. त्यासाठी पाठपुरावा महत्वाचा असतो तरच कामे मार्गी लागतात. जनतेचे अनेक प्रश्न केवळ चिठ्ठीवर सोडविणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात असुद्या काम प्रामाणिकपणे केल्यास यश मिळते, असेही बापट म्हणाले.

First Published on: October 8, 2018 1:19 AM
Exit mobile version