ठाकरे सरकार खंडणी गोळा करणारे सरकार; गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा!

ठाकरे सरकार खंडणी गोळा करणारे सरकार; गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा!

अनिल देशमुख आणि प्रवीण दरेकर

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र खळबळजनक असून पोलीस दलात सुरू असलेल्या घटना या पत्राद्वारे महाराष्ट्राच्या जनतेला कळत आहेत. ते स्वत: पोलीस दलातील अधिकारी असून त्यांनी केलेले आरोप हे गंभीर आहेत. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारची अब्रू वेशीला टांगली गेली असून स्वतःच संशयाच्या फेऱ्यात आलेल्या अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

महाराष्ट्राच्या पोलीस विभागातील धक्कादायक प्रकरणे उघडकीस येत आहेत. पोलीस दलाचे खच्चीकरण होताना दिसत आहे. महाराष्ट्र पोलिसांत अशाप्रकारची अराजकता यापूर्वी कधीच नव्हती. परमबीर सिंहांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, असे दरेकर म्हणाले. राज्य सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व प्रकरणाची दखल घेऊन तत्काळ चौकशी करावी. तसेच अनिल देशमुख यांनी वाझेंना वसुलीचे काम दिले होते का? याचा खुलासा महाविकास आघाडी सरकारने करावा, अशीही मागणी दरेकर यांनी केली आहे.

First Published on: March 20, 2021 9:00 PM
Exit mobile version