राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्बंध लादण्यात येण्याची शक्यता आहे. राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रम, सिनेमा हॉल, हॉटेल्समध्ये ५० टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे. राज्य सरकार अधिकृत गोष्टी बंद करुन अनधिकृतपणे लूट करत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. राज्यातील व्यावसायिक आणि उद्योजक संकटात असल्यामुळ त्यांच्याबाबत राज्य सरकारने सकारात्मक विचार केला पाहिजे असेही प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील निर्बंधांवरुन राज्य सरकारवर घणाघात केला आहे. दरेकर म्हणाले की, ओमिक्रॉनच्या नावावर निर्बंध लादायचे आणि दुसऱ्या बाजूला अनधिकृतपणे त्या सगळ्या गोष्टी सुरु करायच्या म्हणजे जो शासनाला अधिकृतरित्या कर मिळणार आहे तो मिळणार नाही आणि यामुळे सरकारचे नुकसान होईल. तर दुसऱ्या बाजूला महानगरपालिका आणि पोलीस यांनी वेगळ्या मार्गाने आपले किसे भरायचे , वसुली करायची असा डाव अशा निर्णयाच्या मागे असावा असा संशय यायला हरकत नाही. एका बाजूला डांस बार बंद असल्याचे सरकार सांगत आहे. तर दुसऱ्या बाजूला डान्स बार खुलेआम सुरु असल्याचे दिसत आहे. असे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
एसटी आज बंद आहेत. एसटी बंद असताना खासगी वाहतूक मोठ्या प्रमाणात चालत आहे. खासगी वाहतूक दारांकडून मोठ्या प्रमाणावर दलाली घेत असल्याची चर्चा आहे. त्याच्यामुळे ओमिक्रॉनच्या नावावर अधिकृत गोष्टी बंद करत अनधिकृतपणे लूट करण्याचा डाव तर नाही ना अशा प्रकारचा संशय येत आहे.
एकीकडे सरकार डांसबारवर बंदी असल्याचे सांगतेय तर दुसरीकडे मीडियानेच खुलेआम डांसबार सुरु असल्याचे दाखवून दिले. ओमिक्रॉनच्या नावावर अधिकृत गोष्टींवर निर्बंध आणत अनधिकृतपणे लूट करण्याचा हा सरकारचा डाव तर नाही? अशा संशय आता व्यक्त होत आहे. आवश्यक असेल तर निर्बंध जरुर लावावेत (1/2) pic.twitter.com/B4UJRC7I4r
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) December 30, 2021
निर्बंध जरूर लादा पण निर्बंध सहन करण्यापुढे नागरिक गेले आहेत. कारण त्यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. नोकरदार असतील त्यांना आर्थिक चणचण आहे. छोट्या व्यावसायिकांना सरकारने दिलासा दिला नाही. इतर व्यावसायिक असतील, उद्योजक असतील ते हवालदिल झाले आहेत. त्यामुळे निर्बंध लादत असताना या घटकांच्याबाबत सोयी सवलती दिल्या पाहिजेत याचा विचार केला पाहिजे. महाराष्ट्रातील अर्थ्यव्यवस्था आज वाईट परिस्थितीमध्ये आहे. अशा प्रकारे आणखी काही गोष्टी झाल्या तर अर्थव्यवस्था आणखी वाईट होईल असे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
हेही वाचा : सत्तेतून पहिल्यांदा कोण बाहेर पडणार यासाठी ‘मविआ’मध्ये चढाओढ, चंद्रकांत पाटलांचा दावा