पुण्यातील बिबवेवाडी येथे आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. आज, मंगळवारी संध्याकाळी कबड्डीच्या सरावसाठी गेलेल्या या मुलीवर कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आली असल्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आतापर्यंत याप्रकरणातील दोघांना अटक केली असून तिसऱ्याचा शोध सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांची ट्वीट करून महाविकास आघाडीला सवाल केला आहे. चित्रा वाघ म्हणाल्या की, महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडताहेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्र बंद?
कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर
पुण्यातील या प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘अतिशय भयानक, काय चाललयं पुण्यात, कोयत्याने वार करून खून, टाईप करतांनाही अंगावर काटा येतोय काय भोगलं असेल तीने. कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर, पोलिस कायदे कागदावर, महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडताहेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्र बंद?’
प्रियांका गांधी तुम्ही अजून गप्प का?
तसेच चित्रा वाघ यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीसोबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना देखील सवाल केला आहे. त्या म्हणाल्या की, ‘प्रियांका जी, हाथरसच्या घटनेवर तुम्ही अश्रू वाहिले, परंतु पुण्याच्या घटनेबाबत गप्प का आहात? पुण्यात ज्या मुलीची हत्या करण्यात आली, ती तुमच्या मुलीप्रमाणे नाही आहे का? की तुमच्या संवेदना निवडणुकीच्या उत्तर प्रदेशमध्ये जागृत होतात. कुठे आहे महाविकास आघाडीची कायदा आणि सुव्यवस्था?. उत्तर द्या, न्याय द्या.’
हेही वाचा – पुणे हादरलं! १४ वर्षीय कबड्डीपटू मुलीची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या