अलिबाग : सरकारी कामानिमित्ताने संपूर्ण रायगड जिल्ह्यातून लोक अलिबागमध्ये येत असतात. तेव्हा त्यांना दर्शन होते ते चक्री जुगाराचे. गंभीर बाब म्हणजे केवळ अलिबागच नव्हे तर रायगड जिल्ह्यात सर्वत्र चक्री जुगाराचे कमी अधिक प्रमाणात जुगाराचे डाव रंगलेले दिसतात. गुन्हेगारांवर वचक निर्माण काम असणाऱ्या रायगड पोलिसांच्या नाकावर टिच्चून हे काळे धंदे खुलेआम सुरू आहेत, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विशेष म्हणजे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी अनेकदा या जुगारांच्या अड्ड्यांवर कारवाई केली. किंबहुना त्यांनी पदभार स्वीकारल्यावर चक्री जुगार अड्ड्यांचे कंबरडे मोडायला सुरुवात केली होती. त्यानंतर चक्री जुगार सुरू राहत असतील तर कुणाच्या तरी वरदहस्ताशिवाय हे अशक्य आहे, अशी चर्चा अलिबागमध्ये सुरू आहे.
मेगा टॉकीज, मिरची गल्ली, विद्यानगर माय शॉपी शेजारी, सेंट मेरी समोर, पी.एन.पी. नगर, बायपास रोड या भागात चक्री जुगारांचे अड्डे दिसतात. जे अलिबागकरांना दिसते ते पोलिसांना का दिसत नाही, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला आहे. या शिवाय रसायनी, खोपोली, पेण, पनवेल आदी ठिकाणीही चक्री जुगार (Chakri Jugar) खुलेआम खेळले जातात.
रोलेटसह बहुसंख्य जुगार खेळणार्यांना लुबाडलेच जाण्याची शक्यता अधिक असते. एखाद्याला जास्त पैसे मिळाले तरीही त्याला चोरी झाली, आपला माणूस पैसे घेऊन पळाला असे कारणे देत पैसे देण्यास नकार दिला जातो. आणि पैसे वसुलीसाठी धमकी, धाकधपटशाचा वापर केला जातो.
हेही वाचा… Raigad Murud Fishermen angry : महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाविरोधात मुरुडच्या मच्छीमारांनी थोपटले दंड
चक्री जुगारात युवा पिढी वाया जात आहे. चक्री जुगारात प्रवीण असलेले अगदी आपला खिसा घासेपर्यंत आता जिंकू नंतर जिंकू, अशा आशेने रात्रभर खेळत राहतात. आणि चक्री जुगार लावणारे मात्र रात्रभरात लाखोंची कमाई करतात. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर यात्रा पालखीच्या दिवशी जसखार गावात अशा प्रकारच्या चक्री जुगाराच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल झाली. तरीही पोलिसांना (Raigad Police) याची खबर नव्हती, यावर विश्वास ठेवणे अलिबागकरांना अवघड जात आहे.
अलिबाग आणि परिसरात बेधडकपणे सुरू असलेल्या जुगारांच्या अड्डे बंद करून हे काळे धंडे मोडून काढण्यात पोलिसांना अपयश आले आहे. शहरात कोम्बिंग ऑपरेशन, ऑलआउट मिशन राबवण्यात येते. पण त्यात सातत्य नसल्याने जुगाराच्या अड्ड्यांना बळ मिळते आणि यामागे कुणाचातरी वरदहस्त असल्याची चर्चा होताना दिसत आहे.