‘ही’ श्रद्धाच त्यांच्या आयुष्याची ताकद ठरली, राज ठाकरेंची बाबासाहेब पुरंदरेंना आदरांजली

‘ही’ श्रद्धाच त्यांच्या आयुष्याची ताकद ठरली, राज ठाकरेंची बाबासाहेब पुरंदरेंना आदरांजली

मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि शिवशाहीर म्हणून प्रसिद्ध असलेले बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचा पहिला स्मृतिदिन आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या आठवणींना उजाळा देत आदरांजली वाहिली आहे.

आयुष्याची १०० वर्ष ते एकच ध्यास घेऊन जगले, तो ध्यास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बाबासाहेबांच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ऐकताना त्यातली उत्कटता मनाला भिडायची, जसं लतादीदींचं गाणं आर्त वाटतं तशीच ही अनुभूती असायची. ही उत्कटता, आर्तता ही एका जन्मात येऊ शकत नाही. बाबासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांवरची भक्ती ही अनेक जन्मांची असणार. ही श्रद्धाच त्यांच्या आयुष्याची ताकद ठरली, असं राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हा विचार घराघरात पोहचवणं हेच जगणं मानणाऱ्या बाबासाहेबांना हयातीतच नको तो मनस्ताप झेलावा लागला, पण त्यावर त्यांनी अवाक्षर काढलं नाही. आज बाबासाहेब आपल्यात नाहीत. ‘ह्या सम होणे नाही’, असं आपण सहजपणे म्हणतो, खरंच बाबासाहेब पुरंदरेंसारखा ‘शिव’भक्त होणे नाही, पण त्याच वेळेला असं देखील वाटतं माझ्या पिढीचं ठीक आहे पण पुढच्या पिढ्याना अस्सल आणि उत्तुंग व्यक्तिमत्व कशी बघायला मिळणार? असो, काळ हेच त्यावरचं उत्तर आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या स्मृतिदिनी, त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन, असेही राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


हेही वाचा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाचाळवीरांना वेळीच आवरावे, अजित पवारांची सूचना


 

First Published on: November 15, 2022 9:00 PM
Exit mobile version