एकविरा देवी मंदिर आणि राजगडावर लवकरच सुरु होणार ‘रोप वे’ची सुविधा

एकविरा देवी मंदिर आणि राजगडावर लवकरच सुरु होणार ‘रोप वे’ची सुविधा

एकविरा देवी मंदिर आणि राजगडावर लवकरच सुरु होणार 'रोप वे'ची सुविधा

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले एकविरा देवीचे मंदिर आणि किल्ले राजगडावर जाण्यासाठी रोप वे तयार करण्याची महत्वाकांक्षी योजना आखण्यात येत आहे. (ropeway facility at Ekvira Devi Temple and Rajgad soon) त्यासाठी भारतीय पोर्ट रेल आणि रोपवे महामंडळासोबत पर्यटन संचालनालयाने शुक्रवारी सामंजस्य करार केला. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत याबाबतच्या करारावर सह्या करण्यात आल्या. रोपवे मार्गाच्या निर्मितीसाठी आर्थिक आणि तांत्रिक सुसाध्यता अहवाल तयार करणे, निविदा व्यवस्थापन प्रक्रिया राबविणे यासाठी हा करार करण्यात आला. राज्यातील कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (एमसीडीसी) यांच्यासमवेतही सामंजस्य करार करण्यात आला. हे दोन्ही रोपवे प्रकल्प बांधा, वापरा, हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर बांधण्याची योजना आहे. पर्यटन विभागाचा हा पथदर्शी प्रकल्प असेल

आज करण्यात आलेले दोन्ही सामंजस्य करार राज्यातील पर्यटनाला प्रोत्साहन देणारे आहेत. एकविरा देवी मंदीर आणि राजगड किल्ला ही ठिकाणे राज्याची शक्तीपीठ, भक्तीपीठ आहेत. याठिकाणी रोपवे झाल्यास भाविक, पर्यटकांसाठी सुविधा निर्माण होणार आहे. भारतीय पोर्ट रेल आणि रोपवे महामंडळाने सर्व बाबींची एका वर्षात पूर्तता करुन पुढील वर्षी या दोन्ही ठिकाणी भूमिपूजन करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, अशी सूचना आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याने कृषी पर्यटन धोरण जाहीर केले आहे. सहकार विकास महामंडळाबरोबर झालेल्या करारामुळे राज्यातील कृषी पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

साहसी पर्यटन धोरण जाहीर करणार

कोरोनामुळे दीड वर्षापासून प्रत्यक्षात पर्यटन बंद असले तरी भविष्यात राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. राज्याचे बीच शॅक धोरण, कृषी पर्यटन धोरण, कॅराव्हॅन पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे. आता साहसी पर्यटन धोरणही लवकरच जाहीर होत आहे. या प्रकल्पामुळे एकवीरा देवी मंदिर आणि राजगड किल्ला येथील पर्यटनाला तसेच राज्यात कृषी पर्यटनाला चालना मिळेल, असे आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.


हेही वाचा – बारावी परिक्षेच्या मुल्यमापनाचे धोरण लवकरच जाहीर होणार, परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी

 

First Published on: June 11, 2021 8:56 PM
Exit mobile version