आरटीई प्रवेशासाठी पालकांची झुंबड; राज्यभरातून १० हजार ५६३ विद्यार्थ्यांचे अर्ज

आरटीई प्रवेशासाठी पालकांची झुंबड; राज्यभरातून १० हजार ५६३ विद्यार्थ्यांचे अर्ज

राईट टू एज्युकेशन

आरटीई प्रवेश प्रक्रियेला बुधवारी दुपारी ३ वाजता ऑनलाईन सुरुवात झाली. प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांनी संकेतस्थळ सुरू होताच त्यावर अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे सुरुवातील संकेतस्थळ धीम्या गतीने सुरू राहिल्याने पालकांना अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या. मात्र, थोड्याच वेळात संकेतस्थळ सुरळीत सुरू झाल्याने पालकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज भरले. पहिल्या दिवशी संपूर्ण राज्यातून तब्बल १० हजार ५६३ विद्यार्थ्यांचे अर्ज भरले. २०२१-२०२२ या वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी ३ मार्चला दुपारी ३ वाजता सुरुवात झाली. खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश मिळत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील पालकांचे लक्ष आरटीई प्रवेश प्रक्रियेकडे लागलेले असते.

१० हजार ५६३ पालकांनी केले अर्ज 

कोरोनामुळे प्रवेश प्रक्रियेला थोडा विलंब झाल्याने प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांनी बुधवारी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होताच संकेतस्थळावर प्रचंड गर्दी केली. पहिल्याच दिवशी संपूर्ण राज्यातून तब्बल १० हजार ५६३ पालकांनी अर्ज केले. यामध्ये पुण्यामध्ये सर्वाधिक २९७० पालकांनी अर्ज केले. त्याखालोखाल नागपूर ११५२, नाशिक ११४२, ठाणे ८४९, मुंबई ५९३, रायगड ५४९, औरंगाबादमध्ये ४९१ पालकांनी ऑनलाईन अर्ज केले.

प्रवेशासाठी ९६ हजार ६२९ जागा

आरटीई प्रवेशासाठी राज्यभरामध्ये ९४३१ शाळांमध्ये ९६ हजार ६२९ जागा आहेत. आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी २१ मार्च पर्यंत https://rte25admission.maharashtra.gov.in आणि https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. आरटीईअंतर्गत आपल्या पाल्याला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या पालकांनी प्रवेशाकरिता आवश्यक कागद पत्रे तयार ठेवावीत, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

मुंबईमध्ये दोन दिवसांनी प्रवेशाला सुरुवात

मुंबईमध्ये महापालिका अंतर्गत येणार्‍या विनाअनुदानित खासगी शाळा व शिक्षण निरीक्षक कार्यालयांतर्गत अनुदानित खासगी शाळा अशा दोन विभागातून आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. त्यामुळे बुधवारी शिक्षण निरीक्षक कार्यालयांतर्गत खासगी शाळांमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, या शाळांमध्ये ५९३ विद्यार्थ्यांच्या पालकांनी अर्ज केले. मात्र संकेतस्थळावर शाळा अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी थोडासा वेळ लागत असल्याने मुंबई महापालिकांतर्गत खासगी शाळांमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रियेला बुधवारी सुरुवात झाली नाही. मात्र पुढील दोन दिवसांत या शाळा अ‍ॅक्टिव्ह होऊन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली.

First Published on: March 3, 2021 10:52 PM
Exit mobile version