अदानी भ्रष्टाचारावरचे लक्ष उडवण्यासाठी धर्माची भांग, शिवसेनेची भाजपावर जहरी टीका

अदानी भ्रष्टाचारावरचे लक्ष उडवण्यासाठी धर्माची भांग, शिवसेनेची भाजपावर जहरी टीका

किराडपुरा राममंदिर येथे झालेल्या जाळपोळीनंतर गुरुवारी सकाळचे दृष्य

रामनवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगरमध्ये दगडफेक आणि जाळपोळ झाली. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीचे नंतर हिंसाचारात रुपांतर झाले. यात एका जणाचा जीव देखील गेला आहे. तर, राम नवमीच्या मिरवणुकवीर देशात विविध ठिकाणी दगडफेक आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. यावरुन विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनीही या दंगलींवरुन सरकारला घेरले आहे. २०२४ च्या निवडणुकीआधी दंगली घडवून अदानीच्या भ्रष्टाचारावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी या दंगली घडवल्या जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे.

‘रामनाम बदनाम कोण करत आहे?
रामनवमीच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देशात दंगलीच्या ठिणग्या पडल्या. मर्यादापुरुषोत्तम, संयमी, एकवचनी, सत्यवचनी म्हणून श्रीरामाची किर्ती आहे. त्या रामाच्या जन्मदिनी त्याचे भक्त म्हणवून घेणारे हिंसा करतात, इतरांच्या प्रार्थनास्थळांवर दगडफेक करतात, हे चित्र जगातल्या चौथ्या की पाचव्या आर्थिक महासत्तेला शोभा देणारे नाही, उलट देशाची ‘शोभा’ करणारे असल्याची टीका शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनातून करण्यात आली आहे. ‘रामनाम बदनाम कोण करत आहे?’ असा सवाल शिवसेनेने केला आहे.

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, जळगाव, मुंबईतील मालवणी येथे दंगली झाल्या. गुजरातमधील वडोदरा येथे दोन धार्मिक गटांत दगडफेक झाली. पश्चिम बंगालातील हावडा येथेही रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान दंगल घडविण्यात आली. हे सर्व हिंदू-मुसलमानांत झाले व भाजपास हवे तेच झाले. असा थेट आरोप शिवसेनेने केला आहे.

दंगलीमागच्या डोक्यांनी मुहूर्त साधला..
छत्रपती संभाजीनगरात शहराच्या नामांतराची सूचना निघाल्यापासूनच पेटवापेटवीचे प्रयत्न सुरु होते. मात्र दंगलीमागच्या डोक्यांनी मुहूर्त साधला तो श्रीरामनवमीच्या पूर्वसंध्येचाच. दोन गटांतली वादानंतर मुस्लिमांच्या जमावाने राममंदिरासमोरच धुमाकूळ घातला. पोलिसांची वाहने जाळली. राममंदिराजवळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पण हे असे अचानक का घडले? की सर्व काही पूर्वनियोजित व ठरल्याप्रमाणे घडले? असा सवाल अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.
हे कोण महाभाग आहेत, ज्यांना महाराष्ट्राला चूड लावायची आहे?

“हे असे अचानक का घडले? की सर्व काही पूर्वनियोजित व ठरल्याप्रमाणे घडले? रामनवमीच्या शोभायात्रेत नंग्या तलवारी नाचवण्याचे प्रयोजन काय? प्रभू श्रीरामाच्या हाती धनुष्य शोभते, पण राजकीय स्वार्थासाठी धनुष्यबाणाचा सौदा झाल्यापासून निदान महाराष्ट्रात तरी धनुष्यबाणाचे तेज फिके पडले आहे. छत्रपती संभाजीनगरात रामनवमीच्या निमित्ताने अचानक अशी दंगल का उसळावी? हे कोण महाभाग आहेत, ज्यांना महाराष्ट्राला चूड लावायची आहे? अशा दंगलबाज टोळ्यांना हवा देऊन राजकारणी मंडळी शहरे व गावे जाळत असतात”, असे म्हणत शिवसेनेने सत्ताधारी शिदे-फडणवीसांवर थेट आरोप केला आहे.

छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, भिवंडी ही दंगलींची शहरे म्हणून एकेकाळी ओळखली जात होती, पण गेल्या काही वर्षांत हे चित्र साफ बदलले आहे. दंगली नसल्या की अनेकांच्या रोजीरोटीची सोय होत नाही, असेही अग्रलेखात म्हटले आहे.

डॉ. मिंधेनी महाराष्ट्रधर्माचा खेळखंडोबा केला..
“डॉ. मिंधे हे मुख्यमंत्री झाले, पण राज्य अनेक बाबतीत अधोगतीस जात आहे. लोकांचा त्यांना भोपळ्याइतकाही पाठिंबा नाही. त्यामुळे दंगलींचा आधार घेऊन ते स्वतःला हिंदुत्वाचे पुरस्कर्ते मानून घेत आहेत. हा महाराष्ट्र धर्माचा खेळखंडोबाच म्हणायला हवा. हे असे करून कोणी राजकीय भाकऱ्या शेकत असेल तर ते राज्य बुडवायला निघाले आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर करण्यात आली आहे.

हातांना काम
“हाताला काम नसलेल्यांना दंगली घडविण्याचे काम देणारी राजकीय फॅक्टरी गेल्या सात-आठ वर्षांपासून देशात सुरू झाली आहे व प्रभू श्रीरामांच्या नावाने दंगली घडवून वातावरण पेटवा अशी योजना आहे. आठ दिवसांपूर्वीच मुंबईसह महाराष्ट्रात हिंदू नववर्षाच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा, रथयात्रा निघाल्या. त्या शोभायात्रा मुसलमानांच्या मोहल्ल्यांतूनही गेल्या. त्या शोभायात्रांवर कोणी दगड मारले नाहीत व त्या शोभायात्रेत सहभागी झालेल्यांनी मशिदीवर पेट्रोल बॉम्ब फेकले नाहीत. मग हे सर्व पुढच्या आठ दिवसांनी आलेल्या रामनवमीच्या शोभायात्रेतच का घडले? हा संशोधनाचा विषय आहे. गुजरात, महाराष्ट्रात भाजपचे राज्य आहेत.” असे म्हणत शिवसेनेने भाजपच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या नियोजनावरच प्रहार केला आहे.

अदानी भ्रष्टाचारावरचे लक्ष उडवण्यासाठी धर्माची भांग…
“अयोध्येत भव्य राममंदिर उभे राहत आहे. सर्व काही शांततेत सुरू असताना पुन्हा रामाच्या नावाने हिंसा घडवणे हे षड्यंत्र आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांआधी रामाच्या नावाने दंगलींचा आगडोंब पेटवून त्या आगीवर पुन्हा एकदा नकली हिंदुत्वाची भाकरी शेकण्याची ही दळभद्री योजना आहे. देश लुटणाऱ्या अदानी भ्रष्टाचारावरचे लक्ष उडून जावे व दंगलीचा उन्माद माजवून लोकांनी धर्माची भांग पिऊन गप्प पडावे व त्याच भांगेच्या नशेत मतदान करावे असे हे कारस्थान आहे”, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे.

First Published on: April 1, 2023 9:56 AM
Exit mobile version