शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडखोरीमुळे महाराष्ट्र सरकार धोक्यात आले आहे. दरम्यान सरकार अस्थिर असल्याचे थेट संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले होते. राऊतांनी केलेल्या एका ट्विटमुळे महाविकास आघाडी सरकारच्या गोटातही विविध चर्चांना उधाण आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा आता बरखास्तीकडे चालली आहे, असं सूचक ट्वीट केलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकाराचा कारभार अखेरीस अडीच वर्षात संपणार की काय अशा चर्चा रंगू लागल्या. दरम्यान संजय राऊत यांच्या ट्विटमुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे. मात्र या ट्विटवर आता संजय राऊत यांनी आपलं सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले की, “मी सरकार बरखास्त म्हटलं नाही, विधानसभा बरखास्तीच्या दिशेने म्हटलं… जी परिस्थिती मला दिसतेय त्यावर मी माझं मत व्यक्त केलं आहे, मी व्यक्त केलेलं मत फारचं चुकीचं आहे असं मला वाटत नाही.”
“प्रमुख नेते अस्वस्थ”
“ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आमदारांवर दबाव, पळवापळवी, प्रलोभन…. महाराष्ट्राच्या बाहेर त्यांच्यावर हल्ले करणं हे जे प्रकार दिसतायत, ते अस्वस्थ करणार आहे, प्रमुख नेते अस्वस्थ आहे. उद्या, परवा भविष्यामध्ये हे काय वळण घेईल हे आत्ता कोणी सांगू शकत नाही.” असा देखील राऊत म्हणाले.
“भाजपच्या पाठिंब्याशिवाय आमदारांचं अपहरण शक्य नाही’
“अनेक राज्यांमध्ये अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते. तेव्हा साधारण तिकडची विधानसभा ही बरखास्त करून पुढील निवडणुकांना सामोरं जाण्याचा एक मार्ग स्वीकारला जातो. महाविकास आघाडी सरकार एकसंघ आहे, नक्कीच आमचे काही आमदार बाहेर आहेत. त्यातले एक आमदार नागपूरला परतले आहेत, नितीन देशमुख…. त्यांनी जे विमानतळवर त्यांच्यासोबत काय प्रकार घडला ते सांगितलं तो सगळा प्रकार भयंकर आहे. जोपर्यंत सर्व आमदार मुंबईत येत नाहीत, तोपर्यंत कोणतही मत व्यक्त करणं बरोबर नाही. पण भाजपच्या मदतीशिवाय आणि पाठिंब्याशिवाय आमदारांचं अपहरण शक्य नाही. ज्यापद्धतीने जे चित्र आहे ते पाठींब्याशिवाय शक्य नाही.” असा आरोप राऊतांनी करत, या प्रसंगातूनही शिवसेना डाऊन फुलातून बाहेर पडेल,” असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला
सीतेला एकचं अग्निपरीक्षण करावी लागली, शिवसेने अशा अग्निपरीक्षांना वारंवार सामोरे जाते. निष्ठेच्या अग्निपरीक्षेत स्वत:ला शिवसैनिक म्हणून घेणारे किती जण पास होतात हे भविष्यात दिसेल, ज्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकावर जाऊन निष्ठेच्या आणा भाका घेतल्या होत्या त्या सर्वांवर आमचं लक्ष आहे. ज्यांनी पक्षासोबत एकत्र राहण्याच्या.. आणि कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र द्रोह्यांना मदत न करणाऱ्या आणाभाका बाळासाहेब ठाकरेंचं शिवतीर्थ या स्मारकावर घेतल्या त्यांची अग्निपरीक्षा आता सुरु झाली आहे. भविष्यात काय होईल ते दिसेल.असा इशारा यांनी दिला आहे.