शहापूर अघई रस्ता खचला वाहतूक ठप्प !

शहापूर अघई रस्ता खचला वाहतूक ठप्प !

शहापूर अघई रस्ता खचला

तानसा धरणाकडे जाणार्‍या शहापूर ,अघई ,वाडा रस्त्यालगत सावरदेव पाडा येथे एका वळणावरील मोरी ला एक भले मोठे भगदाड पडून रस्ता खचल्याचे चित्र दिसत आहे . येथे अपघाताच्या भितीने या मार्गावरील खासगी वाहतूक व शहापूर वाडा ही परिवहन महामंडळाची बस वाहतूक तातडीने बंद करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प पडल्याने परिवहन महामंडळास देखील रोज हजारो रुपयांचा रोज तोटा सहन करावा लागत आहे.

अघई ,तानसा ,वाडा ,हा रस्ता खचत असताना एखादे भरधाव वाहन येथून जर जात असते तर त्या वाहनास मोठा अपघात होऊन मोठी जिवीतहानी झाली असती, मात्र सुदैवाने या मार्गावरील रस्ता खचण्याची घटना घडत असताना वाहन आले नसल्याने पुढील मोठा अनर्थ टळला, असे येथील स्थानिक रहिवासीयांनी सांगितले. रस्ता खचल्याचे समजताच या घटनेनंतर स्थानिकांनी सावरदेवपाडा येथे घटनास्थळी धाव घेत सतर्कता म्हणून या घटनेचे गांभीर्य पाहून स्थानिक रहिवाशांनी वाहनांच्या सुरक्षेसाठी ढासळलेल्या मोरी व रस्त्याच्या बाजूला दिशादर्शक दगड लावले आहेत.

अघई ,तानसा ,वाडा ,हा मुख्य रस्ता पावसाळ्यात खचल्याने प्रवासी सुरक्षेच्या कारणास्तव आम्हाला तातडीने या मार्गावर धावणारी परिवहनची बस वाहतूक बंद करावी लागली आहे. या मार्गावरील रोज एकूण १२ बसच्या फेर्‍या रद्द कराव्या लागत आहेत. यामुळे दिवसाला ३६ हजार रुपयांचा तोटा परिवहन महामंडळाला सहन करावा लागत आहे .
– आर.टी .मिसाळ, सहाय्यक वाहतूक निरीक्षक

First Published on: August 11, 2019 4:04 AM
Exit mobile version