ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी ब्रिटन वासियांना पहिल्यांदा संबोधित केलं. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेबाबत त्यांनी अधिक माहिती सांगितली. परंतु ते पंतप्रधान झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. भारतीय माणूस काहीही करू शकतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याबाबत दिली.
बारामती मर्चंट असोसिएशनच्या कार्यक्रमात शरद पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात शरद पवारांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केलं. साखर उद्योग, कर तसंच आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर शरद पवारांनी भाष्य केलं. त्यावेळी ते म्हणाले की, ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत, त्यामुळे भारतीय माणूस काहीही करू शकतो.
अतिवृष्टी झाली, पिकाचं नुकसान झालं. जसं नुकसान झालं त्याला दुसरी बाजू आहे. भू गर्भातील पाणी पातळीत वाढ झाली. पाणी पातळीत वाढ झाली त्याचा फायदा होईल. साखर धंदा या परिसरात नवीन नाही. उत्पादनात आपण वाढ करतोय, असं पवार म्हणाले.
मोदींचा जीएसटीला होता विरोध
केंद्र सरकारमध्ये काम करत असताना मनमोहन सिंग पंतप्रधान होते, त्यावेळी त्यांनी जीएसटीची बैठक बोलावली. मात्र जीएसटीला गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनी विरोध केला होता. आज तेच विषय लाऊन धरत आहेत, अशी टीका शरद पवारांनी मोदींवर केली.