रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवारांचे मत बाद करा, शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार

रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवारांचे मत बाद करा, शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार

राज्यसभेच्या निवडणुकीला राज्यात वेगळंच वळण लागलं आहे. यामध्ये राज्यसभेच्या सहा जागांसाठी २८५ आमदारांनी मतदान केलं आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या ३ नेत्यांनी मतदान प्रक्रियेच्या नियमांचे भंग केल्याचा आरोप भाजपाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केला आहे. त्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी खोळंबली आहे. मात्र, भाजपनंतर आता शिवसेनेनेही निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.

शिवसेनेकडून रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मतदानावेळी या नेत्यांनी सुद्धा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रवी राणा यांनी हनुमान चालीसा दाखवून मतदान केले आहे. हनुमान चालीसा दाखवून इतर कुणाला मतदान केले असेल तर हे उघड करणं नियमांचे भंग आहे, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे निवडणूक प्रतिनिधी व्यतिरिक्त मुनगंटीवार यांनी इतर व्यक्तीला मतपत्रिका दाखवली, अशी तक्रार शिवसेनेने निवडणूक आयोगाला केली आहे. तसेच रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवारांचे मत बाद करा, अशी मागणी आता शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

भाजपाने महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने व्हिडिओ फुटेज मागवलं आहे. व्हिडिओ पाहून पुढील निर्णय होईल. परंतु या प्रक्रियेला किती वेळ लागेल हे अद्यापही सांगता येत नाही. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणूक मतमोजणीला ब्रेक लागला आहे.

नवनीत राणा यांचा शिवसेनेला टोला

मी सकाळपासून ही सर्व प्रक्रिया पाहत आहे. महाविकास आघाडीला नेमकी कोणती चिंता सतावत आहे, हे कळत नाहीये. हनुमान चालिसाचं पुस्तक दाखवलं तरी त्यांना अडचण आहे. आम्ही हनुमान चालिसा खिशात घेऊन फिरतो त्यावर कुणी आक्षेप घेण्याचं काही कारण नाही, असा टोला खासदार नवनीत राणा यांनी प्रसार माध्यमांशी साधत शिवसेनेला लगावला आहे.


हेही वाचा : राज्यसभेच्या निवडणुकीत राज्यस्थानमध्ये काँग्रेसचा तीन जागांवर विजय, मुकुल वासनिक यांच्या विजयाचा बुलडाण्यात जल्लोष


 

First Published on: June 10, 2022 9:27 PM
Exit mobile version