सरकार आपलेच येणार मुख्यमंत्री शिवसेनेचा

सरकार आपलेच येणार मुख्यमंत्री शिवसेनेचा

उद्धव ठाकरे यांचे शेतकर्‍यांना आश्वासन

राज्यात आपलेच सरकार येईल आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री मिळेल, असे सांगतानाच आपलं सरकार स्थापन झाल्यावर सर्वप्रथम शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. येथील अवकाळी पाऊसग्रस्त शेतकर्‍यांना भेटल्यावर उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले.

उद्धव ठाकरे हे मंगळवारी लातूर, नांदेड जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. अवकाळी पाऊसग्रस्त शेतकर्‍यांची त्यांनी भेट घेतली. शेतकर्‍यांची बोलत असताना लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी राज्यात शिवसेनेचे सरकार आल्यावर आम्हाला निश्चित कर्जमाफी मिळेल, त्यामुळे आम्हाला शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा, असे उद्धव ठाकरे यांना सांगितले. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे त्वरीत सांगून टाकले.

सरकार स्थापन करायची मला घाई नाही. तसे करायचे असले तर मी मुंबईतच बसलो असतो, येथे आलो नसतो. मात्र सरकार स्थापन करण्यापेक्षा तुमच्यावर आलेले संकट दूर करणे ही माझी प्राथमिकता आहे. म्हणून मी तुमच्या भेटीला आलो आहे. तुमच्या चेहर्‍यावर मला आनंद पाहायचा आहे. जे गेले ते परत मिळणार नाही. त्यामुळे या संकटातून कसा मार्ग काढता येईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत. या संकटावर मात करण्यासाठी शिवसेना खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभी आहे, अशा शब्दांत उद्धव यांनी शेतकर्‍यांना धीर दिला.

First Published on: November 6, 2019 6:16 AM
Exit mobile version