औरंगाबादेतील शिवसेना भवनावरून ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने

औरंगाबादेतील शिवसेना भवनावरून ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने

राज्यातील सत्तासंघर्ष आणि निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे व शिंदे गटातील वाद आणखीनच चिघळला आहे. राज्यातील सर्व शिवसेना शाखांपासून ते विधिमंडळातील आणि महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयापर्यंत हा वाद पोहोचला आहे. अशताच आता आणखी एक नवा ट्वीस्ट समोर आला आहे. त्यानुसार, औरंगाबादच्या औरंगपुऱ्यातील पाचमजली शिवसेना भवनावरून शिवसेनेतील दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. (shivsena office aurangabad dispute between thackeray and shinde group)

मुंबईच्या दादरमधील शिवसेना भवनावर शिंदे गटाकडून दावा करण्यात येणार नसल्याचं आमदार संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे. परंतु, औरंगाबादेतील औरंगपुरा भागातील शिवसेनेचे कार्यालय हे आमचेच असून आम्ही त्यावर लवकरच ताबा घेणार असल्याचे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले आहे.

शिंदे गटाच्या संजय शिरसाठ यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी शिरसाट यांच्या वक्तव्याला खुळचटपणा असल्याचे म्हणत शिंदे गट सत्तेचा माज करत असल्याचे म्हटले. तसेच, औरंगाबादेतील शिवसेना भवनाची जागा ही शिवाई ट्रस्टची आहे. त्यामुळे शिंदे गटाला कार्यालय मिळण्याचा प्रश्नच येत नाही. सुभाष देसाई आणि लिलाधर डाके हे ट्रस्टचे ट्रस्टी असल्याचा दावा विधान‎ परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास‎ दानवे यांनी केला आहे.

‘औरंगाबादमध्ये शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत आहे. परंतु अद्यापही ठाकरे गटाचे कोणतेही कार्यालय शहरात नाही आहे. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह आम्हाला मिळाल्यामुळे आता जे शिवसेनेचे आहे, ते आमचे आहे’, असे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी म्हटले. दरम्यान, ‘राजेंद्र जंजाळ यांना काहीही समजत नाही, या जागेवर शिवसेना भवन उभारण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. त्याचं बांधकाम आता पूर्ण झालेलं असून तिथूनच ठाकरे गटाचं कामकाज चालणार आहे’, असे राजेंद्र जंजाळ यांच्या दाव्याला प्रत्युत्तर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिले.


हेही वाचा – …तर २०२४ नंतर निवडणुका होणार नाहीत, हुकूमशाही सुरू होईल; उद्धव ठाकरेंचा दावा

First Published on: February 20, 2023 6:55 PM
Exit mobile version