राज्यात वाहतूक पोलिसांच्या साडेचार हजार जागा रिक्त

राज्यात वाहतूक पोलिसांच्या साडेचार हजार जागा रिक्त

भारतात वाहतूक पोलिसांच्या २९ हजार ६४२ जागा रिक्त आहेत. यापैकी सर्वाधिक महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रात ४ हजार ६७५ पदे रिक्त असल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. वाहतूक पोलिसांची कमतरता असल्यानेच रस्ते अपघात, वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या 2021 च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. (shortage Of Traffic Police Personnel in state: Data)

अहवालानुसार, देशात २९ टक्के वाहतूक पोलिसांच्या जागा रिक्त आहेत. देशभरात ७३ हजार २८७ वाहतूक पोलीस तैनात आहेत. तर, रिक्त पदांच्या बाबतीत गुजरात ४९ टक्के आणि मध्य प्रदेश ४४ टक्क्यांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. 43 टक्के राजस्थान, महाराष्ट्र 33%, तामिळनाडू 20%, कर्नाटक 15% आणि दिल्ली 12% याठिकाणी वाहतूक पोलिसांच्या जागा रिक्त आहेत. राष्ट्रीय दृष्टीकोनातून पाहिल्यास वाहतूक पोलिसातील 29 टक्के रिक्त पदे अद्याप भरलेली नाहीत. आकडेवारीनुसार, मंजूर 1,02,929 कर्मचार्‍यांपैकी सध्या केवळ 73,287 कर्मचारी तैनात आहेत. 29,642 पदे रिक्त आहेत.

दरम्यान, वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यामुळे भारतात 2020 मध्ये तब्बल 3.66 लाख अपघात झाल्याचीही माहिती समोर आली आहे. यामध्ये 1.31 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वेगमर्यादा ओलांडणे, दारु पिऊन/ड्रग्स सेवन करुन वाहन चालवणे, चुकीच्या बाजूने गाडी चालवणे, सिग्नल तोडणे, मोबाईलचा वापर करणे, यासह इतर वाहतूक नियमांचं उल्लंघन करणे, याचा समावेश आहे.

First Published on: July 13, 2022 10:02 PM
Exit mobile version