राज्यात स्टेज-२ चा करोना!

राज्यात स्टेज-२ चा करोना!

नाशिकमधील सिद्धिविनायक गणपतीच्या मूर्तीला मास्क लावताना पुजारी. (छायाचित्र : एजाज शेख)

महाराष्ट्रासाठी पुढचे पंधरा ते वीस दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी कायदा करणे योग्य नाही. संपूर्ण शटडाऊन करण्याचा विचार नाही. मात्र नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तर महाराष्ट्रात स्टेज-२ चा करोना असून कोरोनाबाधितांची प्रकृती स्थिर आहे. यातील 18 ते 19 व्यक्ती परदेशातून आलेले आहे. तर इतर लोक हे त्यांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोना झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, देशात करोनाचे ११४ रुग्ण असून त्यात ३९ राज्यातील रुग्णांचा समावेश आहे.

करोनाविषयी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजेश टोपे यांच्या उपस्थित सर्व जिल्ह्याधिकार्‍यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोमवारी बैठक झाली. या बैठकीनंतर संध्याकाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राज्यासाठी पुढील 15 ते 20 दिवस महत्वाचे आहेत. पुढील संकट टाळण्यासाठी मंदिर, मस्जिद, चर्चमध्ये गर्दी होऊ देऊ नका. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.

करोनाचा संपूर्ण जगात संसर्ग आहे. जग मंदीच्या फेर्‍यात असताना करोनाचे संकट आलेले आहे. आर्थिक फटका बसणार असेल तर काय उपाययोजना करता येईल, हे सुद्धा यावेळी पाहण्याचे आदेश सचिवांना दिले आहेत,याशिवाय, राज्यातील कोणत्याही शहरांना लॉकडाऊन करणार नाही किंवा पूर्णपणे शटडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही. मात्र जनतेने स्वयंशिस्त पाळावी तसेच, हॉटेल बंद करण्याचा निर्णय अजून घेतलेला नाही. काही हॉटेलमध्ये विलगीकरणाची सोय करण्याचा विचार सुरू आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

परदेशातून जे काही लोक आले होते. त्यांची तपासणी सुरू आहे. केंद्र सरकारकडून जी यादी देण्यात आली होती. त्यानुसार चाचणी केली जात आहे. तसेच, राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा आणि निवडणुका पुढे ढकलण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जेवढी खबरदारी आपण घेऊ, तेवढं हे संकट आपण दूर करू शकतो, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे.

मात्र गर्दी थांबवण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजाअर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी रोखण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.

राज्य सरकारने घेतलेले ११ निर्णय:

१. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या.
२. ग्रामीण भागातील शाळाही बंद ठेवणार.
३. कोरोनाच्या उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीसाठी कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांना प्रत्येकी 15 आणि 10 कोटी तर नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्तांना प्रत्येक 5 कोटी रुपये असा 45 कोटींचा पहिला हप्ता देणार.
४. क्वॉरेंटाईन सुविधा असलेल्या ठिकाणी दूरचित्रवाणी, कॅरमबोर्ड, जेवण आदी सुविधा द्या.
५. ज्यांना 100 टक्के घरी क्वॉरंटाईनच्या सूचना आहेत, त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा जेणेकरुन समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्यांची ओळख पटेल.
६. केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करुन आलेल्यांना सक्तीचे विलगीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत, त्यामध्ये राज्य शासनाकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचाही समावेश करण्यात आला.
७. आवश्यकता भासल्यास व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातून खरेदी करण्याचा जिल्हा प्रशासनाला अधिकार.
८. उद्यापासून मंत्रालयात अभ्यांगतांना प्रवेश न देण्याचा निर्णय.
९. नागरिकांनी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून तक्रारी, अर्ज पाठवावेत. त्यावर जिल्हा प्रशासनाने सात दिवसात कार्यवाही करावी.
१०. घरी विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांची नेमणूक करावी.
११. धर्मगुरु, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन व्यापक जनहितासाठी कायद्याचा प्रभावी वापर करावा.

राज्यातील सर्व निवडणुका पुढे ढकलल्या
करोनाबाबत खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील आगामी ग्रामपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

विलगीकरण केलेल्यांच्या हातावर शिक्के
करोनाचे संशयित रुग्ण म्हणून ज्यांचे घरी विलगीकरण करण्यात आले आहे त्यांच्या हातावर निवडणुकीच्या शाईप्रमाणे शिक्का मारण्यात येणार आहे.

सर्व विद्यापीठांच्या परीक्षा लांबणीवर
राज्यातील सर्व विद्यापीठांंच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व महाविद्यालये
३१ मार्चपर्यंत बंद आहेत.

नागरिकांच्या मंत्रालय प्रवेशावर बंदी
खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयात येणार्‍या नागरिकांच्या प्रवेशावर पुढील आदेश येईपर्यंत बंदी घातली असून, नागरिकांनी इमेल, व्हॉटस्अप आणि टोल फ्री क्रमांकावर तक्रारी कराव्यात. कर्मचारी वगळता मंत्रालयात कोणीही नव्हते.

ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये बंद
शहरी भागातील शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला होता. आता तो निर्णय ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयांनाही लागू करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयेदेखील ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत.

मुंबई हायकोर्टात फक्त दोन तासच काम
मुंबई हायकोर्टात तिन्ही खंडपीठांमध्ये दुपारी १२ ते २ असे दोन तासच कामकाज होणार आहे. त्यामुळे केवळ तातडीच्या व महत्त्वाच्या प्रकरणांचीच सुनावणी करण्यात येईल.

सिद्धीविनायक, तुळजाभवानीचे दर्शन नाही
सिद्धीविनायक मंदिर, कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे मंदिर आणि जेजूरी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थांनी घेतला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत दर्शन बंद केले आहे. ठेवण्यात येणार आहे.

First Published on: March 17, 2020 6:51 AM
Exit mobile version