अशा कारवाईमुळे लोकांच्या मनात संशय निर्माण होतो

अशा कारवाईमुळे लोकांच्या मनात संशय निर्माण होतो

शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रानौत हिच्या कार्यालयाची तोडफोड केल्याबाबत भाष्य केले असून सध्याची पार्श्वभूमी लक्षात घेता करण्यात आलेल्या कारवाईमुळे लोकांच्या मनात संशय निर्माण होण्यास आपण संधी देत असल्याचे म्हटले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवारांनी म्हटले आहे की, कंगनाचे कार्यालय अधिकृत की अनधिकृत माहिती नाही, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणे योग्य नाही. पण मुंबईत बेकायदेशीर बांधकाम काही नवीन गोष्ट नाही. सध्याची पार्श्वभूमी लक्षात घेता केलेली कारवाई पाहून लोकांच्या मनात शंका निर्माण होण्याची संधी आपण देत आहोत. पण शेवटी महापालिकेच्या अधिकार्‍यांची नियमावली आहे, त्यांना जे योग्या वाटलं ते त्यांनी केलं असेल.

दरम्यान कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यावर पवार म्हणाले की, मला असे वाटते की, अशी वक्तव्य करणार्‍यांना आपण अधिक महत्त्व देत आहोत. असे वक्तव्य केल्याने जनमानसावर काय परिणाम होईल हे पहावे लागेल; पण माझ्या मते कोणी गांभीर्याने घेत नाही. महाराष्ट्र, मुंबईच्या लोकांना या शहरातील, राज्यातील पोलिसांचा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. त्यांचं कर्तृत्व त्यांना माहिती आहे. त्यामुळे कोणी पाकिस्तानशी तुलना वगैरे केली तर गांभीर्याने लक्ष देऊ नये.

First Published on: September 10, 2020 6:29 AM
Exit mobile version