टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या तुकाराम सुपेंच्या घरी पुन्हा एकदा २ कोटींपेक्षा अधिकची रोकड सापडली आहे. पुणे पोलिसांनी सुपेंच्या घरावर आज छापेमारी करत २ कोटींची रक्कम आणि सोने हस्तगत केले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा आयोगाचे तुकाराम सुपे हे अध्यक्ष आहेत.
तुकाराम सुपे यांच्या पत्नी आणि मेहुण्याने दुसऱ्या ठिकाणी लपवून ठेवलेली ही रक्कम पुणे पोलिसांनी हस्तगत केली आहे. टीईटी परीक्षा आयोगाचे अध्यक्ष तुकाराम सुपे सध्या अटकेत असतानाही त्यांच्या घरी एवढ्या मोठ्याप्रमाणात रोकड सापडल्याने हे रॅकेट किती मोठे आहे यातून स्पष्ट होतेय. यात अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे देखील समोर आली आहेत.
याआधी १७ डिसेंबरला शिक्षण पात्रता परीक्षेत महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंच्या घरातून पुणे पोलिसांनी ८८ लाख रुपयांचा रोकड जप्त केली होती. यानंतर तुकाराम सुपेंना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सुपेंसह शिक्षण आयुक्तांचे सल्लागार अभिषेक सावरीकर यांनाही पोलिसांनी अटक केली. म्हाडा परीक्षा पेपर फुटीमधील आरोपींची चौकशी करताना पोलीसांना टीईटी परीक्षेतील गैरव्यवहाराची माहिती मिळाली होती. यानंतर महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे म्हाडा पेपर फुटी प्रकरणातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. तुकाराम सुपे यांच्या पुढाकाने आर्थिक गैरव्यावहार करुन विद्यार्थ्यांना पास करण्यात आले आहे. असा आरोप सुपेंवर करण्यात आलाय. पुणे पोलिसांकडून या प्रकरणात सध्या सुपेंची कसून चौकशी सुरु आहे.
यावर पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, या दोन पेपरफुटीचे प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे. म्हाडा पेपरफुटीचा तपास सुरू असताना टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरण समोर आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सुपे आणि सावरीकरला अटक करण्यात आलीय.
म्हाडाचा पेपर फुटण्याच्या तयारी असताना पोलिसांनी म्हाडाची परीक्षा घेण्याची जबाबदारी असणाऱ्या जीए टेक्नॉलॉजी या कंपनीचा प्रमुख प्रीतेश देशमुखला अटक केली होती. पोलिसांकडून प्रीतेश देशमुखची चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये असे आढळले की, २०२० मध्ये जी शिक्षक पात्रता परीक्षा झाली होती. त्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाला होता. तो व्यवहारही तुकाराम सुपे यांच्या पुढाकाराने झाला होता.
राज्यातील २०२० च्या शिक्षक पात्रता परीक्षेत जे उमेदवार ठरले होते त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरवले आणि त्यांना नोकरीत घेतल्याची माहिती पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. यावेळी प्रत्येक परीक्षार्थीकडून ३५ हजार ते एक लाख रुपये घेतले जात असल्याची माहितीही समोर आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाच्या अध्यक्षांना अटक होणे ही महाराष्ट्रासाठी अत्यंत निंदनीय बाब आहे. ज्या विभागाने परीक्षा घ्यायच्या त्याच विभागाचा अध्यक्ष पेपर फुटी प्रकरणात अटक होतो. सैन्य भरती, आरोग्य भरती नंतर म्हाडा आणि आता टीईटीचे प्रकरण एकमेकांशी संबंधित आहेत. यातील आरोपी एकमेकांना कनेक्टेड असल्याचे यावरुन दिसत आहे.