एक दुबळं, मानसिक दृष्ट्या अपंग सरकार राज्यात बसलंय; संजय राऊतांची टीका

एक दुबळं, मानसिक दृष्ट्या अपंग सरकार राज्यात बसलंय; संजय राऊतांची टीका

एक दुबळं, विकलांग आणि मानसिक दृष्ट्या अपंग सरकार या राज्यात बसलं आहे. या सरकारला पाठीचा कणा नाही. स्वाभिमान नाही, महाराष्ट्राचा अभिमान नाही, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच, ‘आम्हाला सांगा कर्नाटकशी आम्हाला लढायचं आहे, त्यासाठी आम्ही आसामला नवस करायला चाललोय’, असा टोलाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राऊतांनी लगावला. (Thackeray Group MP Sanjay Raut Slams Maharashtra CM Eknath Shinde And DCM Devendra Fadnavis)

मंगळवारी सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. त्यावेळी ते म्हणाले की, “चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांना सीमाभागासंदर्भात काम दिलेले आहे. हे दोन मंत्री 3 तारखेला बेळगावांत जाणार आहेत. बेळगावात जाऊन ते काय करणार आहेत? आणि कोणाला भेटणार आहेत?… कन्नड वेदिके संघटनेचे कार्यकर्ते कर्नाटक सरकारच्या पाठिंब्याशिवाय महाराष्ट्रात येऊ शकत नाहीत. ते आपले झेंडे लावतात. हे महाराष्ट्राच्या सरकारमधील काही लोकांचा छुपा पाठिंबा असल्याशिवाय होणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी एकत्रित येऊन याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करायला हवी”

कर्नाटकाशी लढण्यासाठी आम्ही आसामला नवस करायला चाललोय – संजय राऊत

“तुम्ही दिल्लीची वाट पाहणार आहात की, त्या गावातून झेंडे लावण्यासाठी जे लोक घुसलेत त्यांना घालवण्यासाठी परत आसामला जाऊन नवस करणार आहात. आम्हाला सांगा कर्नाटकाशी आम्हाला लढायचं आहे, त्यासाठी आम्ही आसामला नवस करायला चाललोय. ही गंभीर बाब आहे”, असा टोलाही यावेळी शिंदे गटाला राऊतांनी लगावला.

“महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आतापर्यंत अशाप्रकारचे कोणीही धाडस केलं नव्हतं. पण एक दुबळं, विकलांग आणि मानसिक दृष्ट्या अपंग सरकार या राज्यात बसले आहे. या सरकारला पाठीचा कणा नाही. स्वाभिमान नाही, महाराष्ट्राचा अभिमान नाही. अशा सरकारकडून या राज्याचे रक्षण होईल असे आम्हाला वाटत नाही. महाराष्ट्रात घुसलेल्या सगळ्यांवर कारवाई करण्यात यावी. गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्रावर आक्रमण वाढले आहे. त्याचा परिणाम वाईट होईल आणि आम्हाला गांभिर्याने लक्ष घालावं लागेल”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला फटकारले.

सोमवारी सांगली जिल्ह्यातील सीमावर्ती गाव उमराणीमध्ये कन्नड वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यानी भेट दिली. महाराष्ट्रावर नाराज असलेल्या उमराणीच्या ग्रामस्थांनी या कार्यकर्त्यांचे जोरदार स्वागत केले. तसेच ग्रामपंचायतीसमोर एकत्र येत महाराष्ट्र सरकारचा निषेध केला. या वेळी गावकऱ्यांनी कर्नाटक राज्याचा ध्वजही फडकवला. यावरून खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.


हेही वाचा – ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का, माजी आमदार शिंदे गटात सामील

First Published on: November 29, 2022 11:03 AM
Exit mobile version