मविआच्या मोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही, संजय राऊतांचा इशारा

मविआच्या मोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही, संजय राऊतांचा इशारा

हा केवळ ठाकरे गटाचा मोर्चा नाही तर, जनतेचा मोर्चा आहे. आम्ही फक्त नेतृत्व करणार आहोत. त्यामुळे मला खात्री आहे की, आमच्या ‘मविआ’च्या मोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही, असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेली अवमानकारक वक्तव्ये, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून होत असलेली चिथावणीखोर वक्तव्ये आणि महाराष्ट्रातील वाहनांवर होत असलेल्या हल्ल्यांवरून महाराष्ट्रातून अन्य राज्यात पळविले जाणारे प्रकल्प यांसह अनेक मुद्द्यांवर मुंबईत महाविकास आघाडीतर्फे १७ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. पण अद्याप या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. (Thackeray Group MP Sanjay Raut Talk On Mahavikas Agadhi March And Slams Shinde Fadnavis Government)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरूवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीच्या मोर्चाबाबत माहिती दिली. तसेच, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला. “महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी मिळेल. देशामध्ये लोकशाही आहे. या देशामध्ये अजूनही अधिकृतपणे हुकमशाहीची घोषणा झालेली नाही. तसेच, लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या मार्गाने केलेले आंदोलन आणि त्या आंदोलनास सरकार आडकाठी आणू शकत नाही”, असे संजय राऊत म्हणाले.

“राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा म्हणजे एकप्रकारचा मोर्चाच आहे. या भारत जोडो यात्रेत हजारो लोक सामील होत आहेत. पण महाराष्ट्रात असलेले विषय अतिशय गंभीर आहेत. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासारख्या आमच्या दैवतांचा अपमान गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. तसे, घटनात्मक पदावर बसलेला व्यक्ती आमच्या दैवतांचा अपमान करतो. सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख पदावर बसलेले व्यक्ती खुलेआम अपमान करतात. विशेष म्हणजे त्याचे समर्थन सरकार करत आहे. त्यामुळे त्या समर्थनाच्या विरोधात आम्ही मोर्चा काढत आहोत”, असेही राऊत म्हणाले.

“जर तुम्हाला आम्ही मोर्चा काढू नये, असे वाटते तर तुम्ही राज्यपालांना हटवायला हवे होते. शिवरायांचा अपमान केल्याप्रकरणी तुम्ही राष्ट्रीय प्रवक्त्यांवर कारवाई करायाला हवी होती. पण तुम्ही कारवाई केली नाही, त्यामुळे आम्ही मोर्चा काढणार आहोत. त्याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री हे भेटले असले तरीही अद्यार सीमाभागात तणाव आहे. महाराष्ट्राचा ज्या पद्धतीने त्यांनी अवमान केला. हा प्रश्न अजुनही जिवंत आहे. ठिक आहे आम्ही फार टोकाची भूमिका घेणार नाही, पण बघू ते काय करतात. त्यामुळे अशा अनेक प्रश्नांवरती मोर्चा काढून आम्ही महाराष्ट्राचा आवाज केंद्र सरकारकडे पोहोचवू. हा केवळ ठाकरे गटाचा मोर्चा नाही तर, जनतेचा मोर्चा आहे. आम्ही फक्त नेतृत्व करणार आहोत. त्यामुळे मला खात्री आहे की, आमच्या या मोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही”, अशा शब्दांत संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला.

“राज्याच्या विविध भागातून अनेक जण या मोर्चात सहभागी होणार आहे. हा संपूर्ण महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा विषय आहे. महाराष्ट्राचा अपमान सातत्याने होत आहे आणि हे सरकार तोंडाला कुलूप लावून बसलेले आहे. पण जनता कुलूप लावून बसलेली नाही. जनता बोलेल, जनताच या मोर्चात घोषणा देईल आणि गर्जना करेल. तसेच, या गर्जना दिल्लीच्या तक्ता पर्यंत जाईल, असे या मोर्चाचे नियोजन आहे. मोर्चा किती मैल चालला यापेक्षा मोर्चाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येणार आहेत आणि जमणार आहेत. निषेध व्यक्त करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्याबाबतच्या आपला श्रद्धा व्यक्त करणार आहेत”, असेही राऊत यांनी सांगितले.


हेही वाचा – एन. कोटिश्वर आता जम्मू-काश्मीर आणि लडाख हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायाधीश

First Published on: December 15, 2022 10:26 AM
Exit mobile version