राज्यात मागील महिन्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर अनेक पक्षी, पानथळ पक्षी, कावळे, बगळे, कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. या मृत पक्ष्यांच्या नमुन्यांचे परिक्षण केल्यावर त्यांचा अहवाल बर्ड फ्लू सकारात्मक आला. बर्ड फ्लूच्या संसर्गाने कोंबड्या दगावत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यावर अनेक जिल्ह्यांतील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांची कत्तल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. उत्तर महाराष्ट्रात लातूर, नंदूरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोंबड्यांना मारण्यात आले होते. नंदुरबारमधील नवापूरमध्ये बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वात मोठं कलिंग ऑपरेशन सुरु केले होते. हे कलिंग ऑपरेशन मागील पाच दिवसांपासून सुरु होते.
कोरोनानंतर राज्यात बर्ड फ्लूने थैमान घातले आहे. बर्ड फ्लूचा संसर्ग वेगाने पसरु नये यासाठी ज्या जागी बर्ड फ्लूचा संसर्ग आहे. तेथील कोंबड्यांना मारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उत्तर महाराष्ट्रात अनेक पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथील लाखो कोंबड्यांना मागील महिन्यात नष्ट करण्यात आले होते. तर नंदूरबारमधील नवापूरमध्ये राज्यातील सर्वात मोठं कलिंग ऑपरेशन सुरु केले होते. यासाठी एक विशेष पथकही या ठिकाणी हजर झाले होते. या कलिंग ऑपरेशनमध्ये पोल्ट्री फार्ममधील ६ लाख कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. तर यामुळे कुक्कूटपालन व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बर्ड फ्लू आटोक्यात आणण्यासाठी हा प्रयत्न सुरु आहे.
उत्तर महाराष्ट्रीत ५ ते ११ कर्मचारी या कलिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते. या कर्मचाऱ्यांना पीपीई कीट घालून कोंबड्यांना नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले होते. पीपीई कीट घालून कोंबड्यांची कत्तल करताना अनेक कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास झाला तर काहींना उलटी आणि चक्करही आली होती. या कलिंग ऑपरेशनमध्ये ५,७९,३९२ कोंबड्यांना नष्ट करण्यात आले आहे. तर २५,१३,३९२ अंडी नष्ट करण्यात आले आहेत.
कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने घेतल्यानंतर ५११ अधिकारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मिळून हे कलिंग ऑपरेशन सुरु केले होते. या कर्मचाऱ्यांनी कोबंड्यांना नष्ट करुन जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव रोखला आहे. तसेच ३ लाखपेक्षा अधिक पक्ष्यांनाही जिवदान दिले आहे. पशुखाद्य आणि खतही नष्ट केले जाणार आहे. परंतु आता नंदुरबारमध्ये बर्ड फ्लू नष्ट झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. जवळपास १५ कोटी रुपयांचे नुकसान कुक्कूटपालन व्यावसायिकांचे झाले असल्याचे वर्तवण्यात येत आहे.