महाविकास आघाडीतील मतभेद हा केवळ दिखावा : मंत्री बच्चू कडू

महाविकास आघाडीतील मतभेद हा केवळ दिखावा : मंत्री बच्चू कडू

महाविकास आघाडीत मतभेद असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळेल असे देखील वारंवार सांगितले जाते. मात्र यामुळे सत्तेवर काहीही परिणाम होणार नाही. आघाडीत जे वाद दिसत आहे हा केवळ दिखावा आहे आतून सगळे एकच असल्याचे सांगत महाविकास आघाडी भक्कम असल्याचे राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडु यांनी सांगितले.

नाशिक जिल्हा न्यायालयात तारखेसाठी बच्चु कडू आज हजर होते यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात सत्तेत असूनही काँग्रेसकडून केली जात असलेली स्वबळाची भाषा, आघाडी नेत्यांच्या सातत्याने सुरू असलेल्या बैठका, भेटीगाठी यामुळे राज्य सरकारमध्ये अंतर्गत काही तरी शिजतयं असे सध्या तरी दिसून येत आहे. याबाबत बोलतांना मंत्री कडू म्हणाले, नेत्यांमधील संघर्ष हा केवळ वरवरचा असतो तो केवळ मीडीयाला दाखवण्यापूरता असतो. आतून तसे काही नाही. हा वाद खोटा आहे. राजकीय लोकांचे कोणते वाद खरे असतात याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित करत सरकार भक्कम असल्याचे सांगितले. शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता असल्याबाबत विचारले असता मी लहान नेता आहे, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे मी त्याबाबत बोलणार नाही असे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये लव्ह जिहादबाबत चर्चा कानी आली याबाबत मी त्या परिवाराला भेटणार आहे व त्यांच्या पाठीशी उभे राहू असेही ते म्हणाले.

 

First Published on: July 16, 2021 12:27 PM
Exit mobile version