विनोद तावडेंवरील राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी वाढली, ‘या’ समितीतून आखणार निवडणुकीची रणनीती

विनोद तावडेंवरील राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी वाढली, ‘या’ समितीतून आखणार निवडणुकीची रणनीती

विनोद तावडे

Vinod Tawde news | मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणातून अलिप्त झालेले विनोद तावडे यांचा राष्ट्रीय राजकारणात मात्र दबदबा वाढत आहे. भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी असलेल्या विनोद तावडे यांच्यावर आता आणखी एक नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी २०२४ लोकसभा निवडणुकांच्या रणनीती आखण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या निमंत्रक पदी विनोद तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभा २०२४ निवडणुकांसाठी स्थापन करण्यात आलेली समिती रणनीती आखणार आहे. त्यासाठी मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा कोणत्या राज्यांत दुसऱ्या क्रमाकांवर राहिला होता, याची माहिती घेण्यात येणार आहे. ज्या राज्यात भाडपा पिछाडीवर आहे तिथे केंद्रीय समितीकडून राज्यातील संघटनात्मक कार्यक्रम आखण्यात येईल. तसंच, नेत्यांच्या कार्यक्रमाचे आणि दौऱ्यांचेही नियोजन करण्यात येईल. आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवण्याकरता भाजपाने जोरदार प्रयत्न सुरू आहे. त्यासाठीच ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

दरम्यान, २०१४-२०१९ च्या युती सरकारच्या काळात विनोद तावडे राज्याच्या शिक्षणमंत्री पदी होते. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडेंचं तिकिट कापण्यात आलं होतं. त्यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणातून एक्झिट झाले होते. परंतु, पक्षाने राष्ट्रीय स्तरावर त्यांना संधी दिली.

बिहार आणि हरियाणाच्या प्रभारीपदीही विनोद तावडे यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर आता पुन्हा या समितीत निवड केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा विनोद तावडेंवरील विश्वास वाढल्याचं हे द्योतक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाने महाराष्ट्रासाठी ४५ चे लक्ष्य ठेवले आहे. ज्या मतदारसंघात भाजपाचे वर्चस्व नाही तेथे भाजपाने लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. यासाठी केंद्रीय मंत्र्यांचे महाराष्ट्र दौरेही वाढले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात लक्ष ठेवत असतानाच इतर राज्यातही भाजपाल नंबर एकवर आणण्यासाठी पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे.

First Published on: March 9, 2023 12:35 PM
Exit mobile version