निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह : शरद पवार

निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह : शरद पवार

राज्यात येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वपक्षीय नेतेमंडळींना तयारीला सुरूवात केली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही या निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. निवडणुकांबाबत आमच्या पक्षात दोन मतप्रवाह असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. “निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. काहींना वाटतंय की निवडणूक काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेऊन लढावी. तर काही जणांनी एकट्यानं निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे. यावर पक्षात सविस्तर चर्चा होऊन येत्या काळात निर्णय घेतला जाईल”, असं शरद पवार म्हणाले. तसंच कोर्टानं १५ दिवसांत निवडणुका घ्या असे आदेश दिलेले नाहीत, असंही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

शरद पवार कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी “सुप्रीम कोर्टानं १५ दिवसांत निवडणुका घ्या असं म्हटलेलं नाही. निवडणूक तयारीची प्रक्रिया १५ दिवसांत सुरू करा असं कोर्टानं सांगितलं आहे. देशपातळीवर मोदींना सक्षम पर्याय देण्यात अद्याप विरोधी पक्षांना यश येत नाही. मोदींना सक्षम पर्याय देण्यासंदर्भात काँग्रेससह सर्व पक्षांनी याचा अंतर्गत निर्णय घेणं महत्वाचं आहे”, असं शरद पवार म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी शरद पावर यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांना टोला लगावला. अयोध्या दौरा हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही, एवढं बोलून शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला टोला लगावला. “अयोध्या दौरा हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही. कोण अयोध्येला जातंय हे मला माहित नाही. पण देशात महागाई, बेरोजगारी आणि पेट्रोल-डिझेलचे वाढते दर हेच खरे भेडसावणारे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवले जात नाहीत. देशाची सुत्रं आज ज्यांच्या हातात आहेत ते लोक आज पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीकडे ढुंकूनही पाहात नाहीत. त्यामुळेच धार्मिक मुद्दे पुढे रेटून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझा नातू रोहित पवार देखील अयोध्या दौऱ्यावर आहे हे मलाही माहित नव्हतं”, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांनी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगासमोर राजद्राहोचं कलम रद्द करण्याबाबत विचार व्हावा, अशी भूमिका मांडली होती. ‘हे कलम १८९० साली इंग्रजांनी आणलं होतं. पूर्वीच्या काळी राजाविरोधात कोणी आवाज उठवला तर या कलमाचा वापर केला जात होता. आता आपण स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत आणि सत्तेविरोधात बोलण्याचा अधिकार नागरिकांना आहे. त्यामुळे हे कलम आता कालबाह्य असल्याची भूमिका मी मांडली. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टानेही याबाबत भाष्य केल्यानंतर केंद्र सरकारने आम्ही या कलमाचा फेरविचार करणार आहोत, असं असेल तर ही चांगली बाब आहे,’ असं शरद पवार यांनी म्हटलं.


हेही वाचा – जातीयवादावरुन केलेल्या वक्तव्याचा आस्वाद घेतला, शरद पवारांचे टीका करणाऱ्यांना उत्तर

First Published on: May 10, 2022 10:33 AM
Exit mobile version