राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया…

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया…

गुजरातमध्ये सुरतच्या न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या एका खटल्यात दोषी ठरवलं आहे. २०१९ मध्ये त्यांनी मोदी आडनावावर टिप्पणी केली होती. सुनावणीच्या वेळी राहुल गांधी कोर्टात उपस्थित होते. ‘सगळ्याच चोरांचं आडनाव मोदी कसं असू शकतं?’ असं कथित वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर राहुल गांधींना मोठा झटका मिळालाय. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.

“चोराला चोर म्हणणं हा आपल्या देशात गुन्हा ठरला,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टीका केलीय. तसंच चोर देश लुटणारे आजही मोकाट आहेत व राहुल यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. पण तरीही लढत राहू.” अशी तिखट शब्दात उद्धव ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिलीय.

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विटवर ही उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया शेअर केलीय. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते जोरदार आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांना न्यायालयाकडून शिक्षा ठोठवण्यात आल्यानंतर ठिकठिकाणा काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होत भाजपविरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. तसंच विधानसभेतही कॉंग्रेस आमदारांनी सभात्याग करत राहुल गांधींवरील कारवाईचा निषेध व्यक्त केलाय.

First Published on: March 24, 2023 3:55 PM
Exit mobile version