रायगड, महाड, चिपळूणसह रत्नागिरी, सिधुंदुर्गाला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. महाडमधील तळीये गावात दरड कोसळ्याने ४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त भागात राजकीय नेत्यांचे दौरे सुरु झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह काही भाजप नेत्यांनी तळीये, चिपळूणला भेटी दिल्या. भेटीवेळी या नेत्यांनी मांडलेल्या भूमिकांवर शिवसेनेने ‘सामना’तून राजकीय पर्यटन नको असं म्हणत निशाणा साधला. यावर आता नारायण राणे पलटवार केला असून शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
नारायण राणे यांनी ट्विट करत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “जनता आता समोर येऊन राग व्यक्त करु लागल्यामुळे शिवसेना हादरुन गेली व त्यामुळेच सामनामध्ये एकाच विषयावर लागोपाठ दोन दिवस अग्रलेखातून जळफळाट झाला. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि लोकहित जोपासणे याचा शिवसेनेशी कोणताही संबंध राहिलेला नाही हेच यावरुन सिध्द होते. लोकांच्या संकटाचे राजकारण आम्ही करत नाही. मोटार चालविण्याचे कौतुकही करुन घेत नाही. अशा प्रसंगी तळी उचलण्याची सवयच असलेल्यांना तळी उचलू द्या आम्ही लोकांची सेवा करू,” असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला.
लोकांच्या संकटाचे राजकारण आम्ही करत नाही. मोटार चालविण्याचे कौतुकही करुन घेत नाही. अशा प्रसंगी तळी उचलण्याची सवयच असलेल्याना तळी उचलू द्या आम्ही लोकांची सेवा करू.
— Narayan Rane (@MeNarayanRane) July 27, 2021
राजकीय पर्यटन करू नका
मुख्यमंत्री विलासराव देशमुख गेले होते, त्यांच्यासोबत काही लोक होते. तेव्हा त्यांना पदावरून जावं लागलं. अशा घटना घडतात तेव्हा तिथे रेस्क्यू ऑपरेशन करताना डिस्टर्ब होतं. राजकीय नेत्यांनी आपल्यावर नियंत्रण ठेवावं. थोडा संयम ठेवावा. राजकीय पर्यटन करू नका, असं आवाहन करत संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला.