गुजरातमध्ये भाजपचाच डंका, काय आहे कमळ फुलण्याचं रहस्य?

गुजरातमध्ये भाजपचाच डंका, काय आहे कमळ फुलण्याचं रहस्य?

गुजरात विधानसभेचा निकाल भाजपासाठी ऐतिहासिक ठरला असून जुने विक्रम मोडीत काढून भाजपने तब्बल १५७ जागांवर आपली मोहोर उमटवली आहे. तर कॉंग्रेसला फक्त १६ आणि आपला ५ जागा राखता आल्या आहेत. विेशेष म्हणजे मोदी मुख्यमंत्री असतानादेखील भाजपला कधी एवढे घवघवीत यश मिळाले नव्हते. यामुळे भाजपच्या विजयाने सगळ्यांनाच सुखद धक्का बसला आहे.

यावेळी मोरबी मतदारसंघाकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहीले होते. कारण काही दिवसांपूर्वी मोरबी नदीवरचा झुलता पूल तुटल्याने १३० जणांचा मृत्यू झाला होता. याच मुद्दायवरून विरोधकांनी भाजपला लक्ष्य केले होते. यामुळे मोरबी मतदारसंघात भाजपच्या पारड्यात अपयश येण्याचीच शक्यता अधिक ोहती. मात्र मोरबीच्या नागरिकांनी भाजपच्या कांतिलाल अमृतिया यांना भरभरून मत देत विजयी केले. कच्छ जिल्ह्यत कांतिलाल यांनी ६२ हजार मत जिंकत विजय मिळवला. कांतिलाल यांना १ लाख १४ हजाराहून अधिक मत मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार जयंतीलाल जेराजभाई यांना अवघ्या ५२ हजारांवर समाधान मानावे लागले. तर आपचे उमेदवार पंकज कांतिलाल यांना फक्त १७ हजार मत मिळाली.

मोरबी पूल तुटल्यानंतर कच्छू नदीत पडलेल्यांच्या बचावासाठी कांतिलाल अमृतिया यांनी थेट नदीत उडी मारत अनेकांचे प्राण वाचवले. तेव्हापासूनच ते चर्चेत होते. त्याचाच फायदा भाजपला विधानसभा निवडणुकीत मिळाला . तसेच कोरोना परिस्थिती हाताळण्यातही गुजरातला अपयश मिळाले होते. त्यामुळे विरोधकांकडून भाजपवर सतत हल्लाबोल करण्यात येत होता. मात्र भाजपने चाणाक्ष रणनिती आखत २०१७ निवडणुकीचा अनुभव लक्षात घेत नवोदितांना संधी दिली होती. त्यासाठी राजकीय डावपेच रचले होते.

दरम्यान, २०१७ विधानसभा निवडणुकीपूर्वी पाटीदार समाजाने आरक्षणाची मागणी करत आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याने पाटीदार समाज भाजपवर नाराज झाला होता. परिणामी पाटीदार समाजाने २०१७ निवडणुकीत काँग्रेसला पसंती दिली. यामुळे संभाव्य धोका ओळखत भाजपने यावेळच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत पाटीदार समाजाचे भूपेंद्र पटेल यांच्याकडे नेतृत्व सोपवले. यामुळे त्याचाच फायदा या विधानसभा निवडणुकात भाजपला झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान गुजरातमधील मध्यम वर्गीय आणि शहरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये मोदी प्रचंड लोकप्रिय आहेत. यामुळे हा विजय भाजपचा नाही तर मोदींचा असल्याचाही दावा नागरिक करत आहेत. गुजरातमध्ये भाजपने रेकॉर्डब्रेक ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मात्र आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय काँग्रेसच्या नावावर होता. १९८५ साली माधव सिंह सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने विजय मिळवला होता. त्यावेळी काँग्रेसला १४९ जागांवर विजय मिळाला होता. भाजपसाठी मात्र हा मोठा धक्का होता. गुजरातमध्ये गेली २७ वर्ष भाजपची सत्ता आहे. १९९५ पासून भाजप सतत विजयी होत आहे. पण असे असले तरी काँग्रेसचे ४० टक्के मतदार आहेत. पण तरीही भाजपने ज्या समाजांशी जवळीक ठेवली आहे त्यात सामाजिक स्तरावर प्रभावशाली व्यक्तींचा समावेश आहे. यामुळे त्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातही होतो. याचीच परिणिती आजचा विधानसभा निकाल असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दरम्यान गुजरात विधानसभा निवडणुक आपमुळे प्रतिष्ठेची झाली होती. याच पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातील मंत्र्यांबरोबर केंद्रीय मंत्र्यांना देखील या निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरवले होते. यात महाराष्ट्रातील काही मंत्र्यांचा सहभाग होता. याचाच परिणाम आजच्या गुजरात निवडणुकीच्या निकालातून दिसून आला.


माझ्यावर दडपशाही वाढेल, शॉर्टकटचे राजकारण घातक, मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

First Published on: December 8, 2022 9:03 PM
Exit mobile version