मुख्यमंत्री दाढीला कात्री लावतील का? सावरकरप्रेमावरून ‘सामना’तून शिंदेंना टोला

मुख्यमंत्री दाढीला कात्री लावतील का? सावरकरप्रेमावरून ‘सामना’तून शिंदेंना टोला

मुंबई – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावरकरांविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे केंद्र आणि राज्य सरकारने त्यांच्याविरोधात एल्गार पुकारला आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारने सावरकर गौरव यात्रा काढण्याचे ठरवले आहे. मात्र, यावरूनच ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार करण्यात आले आहेत.

वीर सावरकरांना ‘दाढी’चा अत्यंत तिरस्कार होता. त्याबाबतीत त्यांनी तुर्कस्तानच्या केमाल पाशाचे धोरण स्वीकारले. त्यामुळे सावरकरांना मान्य नसलेल्या दाढीला मुख्यमंत्री गुळगुळीत कात्री लावतील काय?, असा सवाल या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला आहे.

हेही वाचा – मुंबादेवी परिसराचा पुनर्विकास करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

दाढी वाढवणे वगैरे प्रकार, शेंडी-जानवे, गाईस गोमातेचा दर्जा देणे वगैरे कर्मकांडे वीर सावरकरांना मान्य नव्हती. मंत्र-तंत्र, जादूटोणा, रेडाबळी वगैरे प्रथांना त्यांचा विरोध होता. गौरव यात्रा काढणाऱ्यांनी सावरकरांच्या या विचारांचा प्रसारही करायला हवा. तरच सावरकर गौरव यात्रा सार्थकी लागेल. हिंदुत्वाच्या नावावर सध्या काहीही व कसेही खपवले जाते. धर्माचे राजकारण बाळासाहेब ठाकरे यांनाही मान्य नव्हते. मला हिंदूंचा खोमेनी व्हायचे नाही, असे ते जाहीरपणे म्हणत, पण महाराष्ट्राचे व देशाचेही राजकारण खोमेनींच्या मार्गाने सुरू आहे. आता हा खोमेनी कोण? हे डॉ. मिंधे यांनी विचारू नये. ते आता आयतेच डॉक्टर झाले आहेत. त्यामुळे जगाचे ज्ञान त्यांनी आत्मसात केले पाहिजे. ज्ञान हे तपस्या व अनुभवातून मिळते, खोक्यांतून मिळत नाही व धर्मांध विचारांच्या कचऱयातून तर ते अजिबात प्राप्त होत नाही, असं म्हणत शिंदे गटावर जोरदार प्रहार केला आहे.

धर्म आणि राजकारण जेव्हा भिन्न होतील आणि राजकारणी धर्माचा वापर राजकारणासाठी करणे थांबवतील तेव्हा ‘हेट स्पीच’ म्हणजे द्वेषमूलक भाषणेदेखील थांबतील, पण मुसलमानांकडे बोट दाखवून ‘गोली मारो साले को’ अशा चिथावण्या देणारे लोक केंद्रात मंत्री म्हणून बसले आहेत. बिल्कीस बानोवर बलात्कार करणाऱयांची जेलातून सुटका होते व त्यांचा धर्मवीर म्हणून गौरव केला जातो. महाराष्ट्रात सत्ता मिळावी म्हणून कामाख्या देवीच्या मंदिरात रेड्यांचे बळी दिले जातात. हे काही पुढारलेल्या पुरोगामी देशाचे लक्षण नाही. धर्म ही अफूची गोळी आहे व ती बंदुकीच्या गोळीपेक्षा घातक आहे. धर्मांध राजकारणाने एकदा देशाची फाळणी झाली आहे. जगभरात धर्मांधतेमुळे अनेक देश तुटले. हिंदुस्थानला असा नवा घाव परवडणारा नाही, असा इशाराही या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

धर्माचे राजकारण करून सत्ता मिळवणे व त्यासाठी लोकांचा बळी देणे ही नामर्दानगी आहे. मंत्रालयासमोर तिघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातील शीतल गाडेकरचा मृत्यू झाला. या घटनांकडे थंडपणे पाहत दाढीवर हात फिरवणे हेसुद्धा नपुंसकपणाचे लक्षण आहे. सर्वोच्च न्यायालयाने मिंधे सरकारच्या वर्मावरच घाव घातला. आता सर्वोच्च न्यायालयाने अवमान केला म्हणून सत्तेतले ‘चोर मंडळ’ नपुंसक शेऱयावरही हक्कभंग आणणार काय?, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित करण्यात आला आहे.

First Published on: March 31, 2023 9:28 AM
Exit mobile version