औरंगाबादेत विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू, चिमुकल्यांनी गमावलं मातृछत्र

औरंगाबादेत विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू, चिमुकल्यांनी गमावलं मातृछत्र

औरंगाबादेत (Aurangabad) विजेचा धक्का लागून एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना ६ जून रोजी मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. अश्विनी भगवान पठाडे (Ashwini Pathade)(३२) असं मृत महिलेचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भगवान पठाडे (Bhagwan Pathade) यांचे ढोरेगाव (Dhoregaon) येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या (Bank of Maharashtra) पाठीमागे वॉटर फिल्टरचे (Water Filter) दुकान आहे. त्यांच्या पत्नी अश्विनी भगवान पठाडे या पहाटे ५ वाजताच्या सुमारास मोटर चालू करण्यास गेल्या. त्यानंतर त्यांना अचानक विजेचा (Shock) तीव्र झटका बसला आणि त्या वायरल्या चिकटल्या. पहाटेच्या सुमारास आजूबाजूला कुणीही नसल्यामुळे ही बाब लवकर लक्षात आली नाही.

दरम्यान, बराच वेळ झाला तरी देखील अश्विनी या घरात आल्या नसल्यामुळे त्यांचे पती भगवान पठाडे हे त्यांना बघण्यासाठी गेले. त्यावेळी त्या बेशुद्ध अवस्थेत खाली कोसळलेल्या होत्या. विजेचा झटका बसल्यामुळे त्यांचा हात काळा पडला होता. ही बाब भगवान पठाडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली. परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालावली.

अश्विनी यांना एक दहा वर्षाचा मुलगा आणि एक सहा वर्षाची मुलगी आहे. परंतु अचानक चिमुकल्यांचं मातृछत्र हरवल्यामुळे येथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अश्विनी यांच्या पश्चात पती, सासू, दीर,जाऊ, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे.


हेही वाचा : मुलीला चौथ्या मजल्यावर एकटचं का ठेवलं? अजित पवारांचा सवाल


 

First Published on: June 7, 2023 6:58 PM
Exit mobile version