ई-तिकिटांचा गैरव्यवहार करणाऱ्या ८९१ एजंटना अटक

ई-तिकिटांचा गैरव्यवहार करणाऱ्या ८९१ एजंटना अटक

प्रातिनिधिक फोटो

सणासुधीच्या आणि सुट्ट्यांच्या काळामध्ये गावाकडे आणि पर्यटनस्थळी जाणाऱ्या प्रवाशांची रेल्वे तिकीट एजंटकडून वारंवार लूट होत असते. दिवाळी दरम्यान रेल्वे तिकीट एजंटांकडून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी देशभरामध्ये धडक मोहीम सुरु करण्यात आली आहे. आरपीएफ म्हणजेच रेल्वे सुरक्षा बलाने ऑपरेशन स्मार्ट ही मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत आरपीएफने १०० शहरांमध्ये ई-तिकिटांचा गैरव्यवहार करणाऱ्या ८९१ दलालांना अटक केली आहे. या दलालांकडून ५ कोटी ७५ लाख रुपयांचे तिकीट जप्त करण्यात आले आहेत.

३६ लाखांचे १८७५ तिकीट जप्त

आरपीएफच्या माध्यमातून केलेल्या या कारवाईमध्ये आतापर्यंत पश्चिम रेल्वेच्या हद्दीमध्ये शनिवारी ४० आणि पूर्व रेल्वेच्या हद्दीतील ३२ दलालांना अटक केली. या दलालांकडून आरपीएफने तिकीट देखील जप्त केले आहेत. पुढील काही महिन्यांसाठी आरक्षित केलेली ३६ लाखांचे १८७५ तिकिट जप्त केली. त्याचबरोबर मुंबईतून एक अवैध सॉफ्टवेअर सुध्दा जप्त करण्यात आले आहे. या तपासादरम्यान अशी देखील बाब समोर आली आहे की, अवैध पध्दतीने ई-तिकिट काढण्यासाठी १२६८ वैयक्तिक आयडीचा वापर केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. या आयडीचा वापर बंद करण्यात यावा यासाठी ही यादी आयआरसीटीसीकडे पाठवण्यात आली आहे.

५ कोटी ७५ लाख रुपयांचे तिकीट जप्त

गेल्या महिनाभरापासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून आरपीएफकडून ही कारवाई सुरु आहे. आतापर्यंत ८९१ दलालांना अटक झाली असून त्यांच्याकडून ५ कोटी ७५ लाख रुपयांचे तिकीट जप्त केले आहेत. तर अवघ्या २० दिवसामध्ये २४४ दलालांवर कारवाई करत त्यांना अटक करत त्यांच्याकडून १ कोटींची तिकीट जप्त केले आहेत. तर शुक्रवारी आणि शनिवारी केलेल्या कारवाईत ४० दलालांना अटक करुन त्यांच्याकडून १६ लाखांची ९०० तिकीट जप्त करण्यात आली आहे.

First Published on: November 5, 2018 1:25 PM
Exit mobile version