‘आपलं महानगर’च्या ठाणे आवृत्तीचा दमदार प्रकाशन सोहळा!

‘आपलं महानगर’च्या ठाणे आवृत्तीचा दमदार प्रकाशन सोहळा!

आपलं महानगर वृत्तपत्राच्या ठाणे आवृत्तीचा सोहळा

गेल्या ३० वर्षांपासून मुंबईमध्ये आपल्या बातम्या, आपल्या बातम्या या ब्रीदवाक्यासह निर्भिड आणि निष्पक्ष पत्रकारितेचा आदर्श नमुना सादर करणाऱ्या ‘आपलं महानगर’ या दैनिकानं ठाण्यात दमदार पाऊल टाकलं आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून ‘आपलं महानगर’ची ठाणे आवृत्ती ठाणेकरांसाठी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या बातम्या आणि त्याचसोबत त्यांना आवडणाऱ्या बातम्या घेऊन येणार आहे. या आवृत्तीचं आज ठाण्यातील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झालं. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल, शहर पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी या सर्वांनी ‘आपलं महानगर’च्या गेल्या ३० वर्षांच्या गौरवपूर्ण प्रवासाचा उल्लेख करत ठाण्यातील पुढील प्रवासासाठी देखील शुभेच्छा दिल्या.

 

वर्तमानपत्रांचं समाजात अनन्यसाधारण महत्त्व – एकनाथ शिंदे

‘महानगर दैनिकाला मोठा वारसा आहे. निखिल वागळेंनी या दैनिकाची अनेक वर्ष धुरा सांभाळली. तेव्हापासून १३ वर्ष हे दैनिक सुरू आहे. आज ते ठाण्यात येत आहेत. चुकीच्या गोष्टींवर प्रहार आणि चांगल्या गोष्टींचं कौतुक त्यांनी केलं आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून वर्तमान पत्रांचा वारसा आहे. त्यामुळे वर्तमानपत्रांचं अनन्यसाधारण महत्त्व समाजात आहे. खऱ्या आणि चांगल्या बातम्या आपलं महानगर देत आहे. आता ठाण्यातल्या बातम्या आणि चांगल्या कामांची दखल तुम्ही घ्या, काही सुधारणा असतील तर त्या सांगा, त्याची नक्कीच दखल घेतली जाईल, अशा शब्दांत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘आपलं महानगर’ला शुभेच्छा दिल्या.

१०० वर्षांपूर्वी मूकनायक सुरू झाला होता – जितेंद्र आव्हाड

‘आजपासून बरोबर १०० वर्षांपूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक पेपर सुरू केला होता. बीआयटीमध्ये शाहू महाराजांनी त्यांनी २५० रुपये दिले आणि मूकनायक सुरू झालं. आजच महानगर ठाण्यात येतंय. आजही देशाला एका मूकनायकाची आणि भीमरावाची गरज आहे. विशिष्ट व्यवस्थेच्या हातात असलेले वृत्तपत्र सोशित, दलित समाजाबद्दल फार काही लिहितात, असं वाटत नाही. निखिल वागळेंनी अनेकांना झोडलं, पण आजही या क्षेत्रात त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. समाजप्रबोधनाचं मुख्य काम वृत्तपत्रच करत असतात. आजकाल भिती वाटते पण जेव्हा कॅमेरा नावाचा राक्षस समोर आला, की तोंडाला टेप बसते. हा राक्षस फारच डेंजर आहे, असं यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. ‘आपलं महानगर विद्रोही विचारांचं वृत्तपत्र आहे. त्याचा इतिहास विद्रोहाचा आहे’, असं देखील आव्हाडांनी यावेळी सांगितलं.

‘महानगर’वर पहिला हल्ला नरेश म्हस्केंनीच केला होता – नरेश म्हस्के

‘माझे आणि महानगरचे संबंध खूप जुने आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या विरोधात बातमी लागली, की पहिला महानगर जाळला जायचा, तो ठाण्यात. सगळीकडे महानगर मिळायचा, पण ठाण्यात नव्हता मिळत. हे सगळं करण्यात नरेश म्हस्के पुढे असायचा. महानगरवर पहिला हल्ला झाला, तो नरेश म्हस्केनीच केला होता. तेव्हाचं ते वय होतं. आता त्या गोष्टी पटत नाहीत, पण एक उर्मी होती. पण असं झालं, तरी आजही निखिल वागळेंशी माझे संबंध तसेच मधुर आहेत, अशी आठवण यावेळी बोलताना ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितली. ‘शिवसेना सत्ताधारी झाली, यात महानगरचा मोठा वाटा आहे. त्यावेळी महानगरने शिवसेनेला झोडलं. त्यामुळे शिवसेना पेटून उठली आणि त्याचा परिणाम म्हणून आज शिवसेना सत्तेत आहे’, असं देखील म्हस्के यांनी यावेळी सांगितलं.

First Published on: January 31, 2020 11:25 AM
Exit mobile version