ईडीच्या चौकशीविरोधात काँग्रेसची राजभवनावर धडक

ईडीच्या चौकशीविरोधात काँग्रेसची राजभवनावर धडक

नॅशनल हेराल्डप्रकरणी होत असलेल्या काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी राजभवनावर धडक मोर्चा काढण्यात आला. हँगिंग गार्डन ते राजभवनदरम्यान काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते सहभागी झाले होते. राजभवनाला घेराव घालण्यासाठी निघालेला हा मोर्चा पोलिसांनी बॅरेकेडिंग करून राजभवनापासून ५०० मीटर अंतरावर अडवला.

केंद्रातील भाजपचे सरकार काँग्रेस नेतृत्वाला सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून घाबरवण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु अशा दबावाला अथवा दहशतीला आम्ही भीक घालत नाहीत. देशातील जनतेचे प्रश्न हाती घेत मोदी सरकारला सातत्याने कोंडीत पकडणारे राहुल गांधी देशाचा आवाज बनले आहेत. त्यांच्यावरील सूडबुद्धीच्या कारवाईमुळे काँग्रेसचा कार्यकर्ता पेटून उठला आहे. ही कारवाई आम्ही सहन करणार नाही. केंद्र सरकारविरोधातील आमचा संघर्ष सुरूच राहील, असा इशारा नाना पटोले यांनी यावेळी दिला.

या मोर्चानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, राजकीय द्वेषातून भाजप सरकार करीत असलेल्या कारवाईविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली असताना पोलीस बळाचा वापर करून मंत्री, खासदार आमदार, महिला कार्यकर्ते यांना मारहाण केली जात आहे. देशात आज अराजकता निर्माण केली आहे. याविरोधातील असंतोष व्यक्त केला जात आहे. केंद्रातील बहिर्‍या आणि मुक्या सरकारपर्यंत असंतोषाचा हा आवाज पोहचवण्यासाठी राजभवनावर धडक मोर्चा काढला असून केंद्र सरकारविरोधातील आमचा हा संघर्ष सुरूच राहील.

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही केंद्र सरकारवर टीका केली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटिसा पाठवून नाहक त्रास दिला जात आहे. तीन दिवस राहुल गांधी यांचा चौकशीच्या नावाखाली छळ केला जात आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता केंद्र सरकारची हा दडपशाही सहन करणार नाही. या मोर्चाच्या माध्यमातून हा असंतोष मोदी सरकारपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्या कुटुंबाने देशासाठी सर्वस्व त्याग केला, बलिदान केले, त्या कुटुंबाला अशा प्रकारे त्रास देणे निंदनीय आहे, अशी टीका थोरात यांनी केली. मोदी सरकारच्या या दडपशाहीला सोनिया आणि राहुल गांधी पुरून उरतील. आमचे हे नेते मोदी सरकारसमोर कदापि झुकणारे नाहीत, असा इशारा थोरात यांनी दिला.

खोट्या प्रकरणात अडकवून आमच्या नेतृत्वाला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु आम्ही ते सहन करणार नाही. आम्ही आमच्या तीव्र भावना मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. राज्यपाल महोदयांनी आमच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहचवाव्यात, अशी अपेक्षा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

या मोर्चात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री विश्वजित कदम, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, आमदार अमर राजूरकर, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, बसवराज पाटील, उपाध्यक्ष मोहन जोशी आदी सहभागी झाले होते.

First Published on: June 17, 2022 5:45 AM
Exit mobile version