Corona Alert : मुंबईकरांनो सावध व्हा! ‘ही’ आहे धोक्याची घंटा

Corona Alert : मुंबईकरांनो सावध व्हा! ‘ही’ आहे धोक्याची घंटा

कोरोना

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कोरोनाच्या काळात बंद करण्यात आलेली मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली लोकल देखील सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि १ फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी लोकल धावू लागली. मात्र, आताचे चित्र पाहिले असता कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. रुग्णसंख्येचा खाली गेलेला आलेख पुन्हा एकदा वर जाऊ लागला आहे. त्यामुळे यंत्रणांसह सामान्य नागरिकांसाठी ही धोक्याची घंटा असून कोरोनाविषयी बेफिकीर होणे धोकादायक ठरेल, असा सल्ला राज्याच्या टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

कोरोनाच्या संख्येते वाढ होण्याचे कारण

गेल्या काही दिवसांपासून गारठा वाढलेला आहे. त्यामुळे हे एक प्राथमिक कारण असावे. यावरुन कोरोनाची साथ अद्याप संपलेली नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. कारण सध्याच्या घडलीला मुंबईकर जणू कोरोना संपलेला आहे, असे वागू लागले आहेत. मात्र, कोरोनाची साथ अद्याप संपलेली नाही. एकीकडे कोरोनावरील लस देण्याची मोहिम सुरु आहे. मात्र, दुसरीकडे मुंबईकरांचा बेफिकीर पणा देखील याला कारणीभूत ठरत आहे. कारण लोक कोरोनाला आता गांभीर्याने घेत नाहीत. मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे. नियमांचे उल्लंघन करणे. या गोष्टींमुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाची पहिली लाट आली, त्यावेळी जसे नागरिक वागत होते. त्याप्रमाणे आता वागणे ही गरजेचे आहे, असे मत टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले आहे.

वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवाव्यात

कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली तरी देखील त्वरित उपचार मिळतील, अशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवणे फार गरजेचे आहे. विशेष म्हणजे पहिल्या लाटेच्या वेळी ज्या चुका झाल्या आहेत. त्या यावेळी दुरुस्त करायला हव्यात. लॉकडाऊनसारखे उपाय टाळायला हवेत.

लसीकरणाबाबत जनजागृती

लसीकरणसंदर्भातील जनजागृती करण्यासाठी बहुमाध्यममी प्रदर्शनकारी व्हॅनला हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे. ही गाडी मुंबईत तीन मार्गांवरुन प्रवास करणार आहे. वांद्रे-धारावी-जुहू-अंधेरी-बोरीवली, गोरेगाव-चिंचवली-मालाड-कांदिवली-चारकोप-बोरीवली-दहीसर, कुर्ला-चेंबूर-घाटकोपर-मानखुर्द-तुर्भे-भांडुप-विक्रोळी असे तीन मार्ग आहेत.


हेही वाचा – काळाचौकीमध्ये ज्वेलर्सवर दरोडा; २ कोटी ८२ लाखांचे दागिने पळवले


 

First Published on: February 17, 2021 11:39 AM
Exit mobile version