कोरोनाच्या चाचण्या आता माफक दरात केल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने कोरोना चाचणीचे दर कमी केले असून नागरिकांना दिलासा दिला आहे. आरोग्य विभागाने याबाबत आढावा घेतला असून ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा दर आता १२०० रुपये एवढा कमी केला आहे. यापूर्वी कोरोना चाचणीसाठी राज्यात ४ हजार ५०० रुपये प्रतिचाचणी मोजावे लागत होते. हे दर कमी करण्याबाबत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जूनमध्ये एका समितीची स्थापना केली होती.
या समितीने त्यावेळी कोरोना चाचणी करणाऱ्या सर्व खासगी प्रयोगशाळांच्या मालकांबरोबर चर्चा करून ‘आरटीपीसीआर’ कोरोना चाचणीचे दर ४ हजार ५०० हजार रुपयांवरून २२०० रुपयांपर्यंत कमी करण्यात आले होते. याबाबत डॉ. सुधाकर शिंदे यांनी सादर केलेल्या अहवालात हा चाचणी दर आणखीही कमी होऊ शकतो असे नमूद करण्यात आले होते. यासाठी केंद्र सरकारने या चाचणीसाठी लागणाऱ्या रिएजंटस्वरील जीएसटी आणि आयात कर माफ केल्यास हे दर निश्चित कमी होतील, असे स्पष्ट केले होते.
तसेच आयसीएमआरने अॅण्टीबॉडी चाचणीलाही मान्यता दिली असून या चाचणीसाठी सध्या ५५० ते ६०० रुपये खर्च येत असून कोरोनाला वेगाने अटकाव घालायचा असल्यास जास्तीत जास्त चाचण्या झाल्या पाहिजे असे आयसीएमआर तसेच अनेक ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून या समितीने आपला अहवाल सरकारला सादर केल्यानंतर आज, ७ सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाने आदेश जारी करून खासगी चाचणी केंद्रावर जाऊन करोना चाचणी केल्यास १२०० रुपये दर जाहीर केला आहे. जर रुग्णाचे चाचणी सॅम्पल कोरोना केंद्रातून जमा केल्यास चाचणीसाठी १६०० रुपये तर घरांमधून सॅम्पल घेतल्यास २००० रुपये दर निश्चित करण्यात आले असून यापेक्षा जास्त दर खासगी चाचणी केंद्रांना आकारता येणार नाही.