दहिहंडी उत्सवाला यंदा मरगळ

दहिहंडी उत्सवाला यंदा मरगळ

गल्लीबोळातून निघणार्‍या मोटरसायकल्स आणि वाहतूक कोंडी करणारे ट्रकच्या ट्रक भरून जाणारे गोविंदाचे पथक, डीजेची धडकी भरणारा आवाज, बघ्यांच्या गर्दीचे लोट असा दरवर्षी दहिहंडीला असणारा माहोल शनिवारी कुठेतरी हरवल्यासारखा दिसला. त्यामुळे यंदाच्या दहिहंडीचा उत्सव चुकल्या चुकल्यासारखा वाटला. नेहमी दहिहंडीच्या निमित्ताने असणारा जल्लोष यंदा अतिशय तुरळक ठिकाणीच पहायला मिळाला. एकूणच दहिहंडी आयोजक ढेपाळल्याने गोविंदांचा उत्सवही मरगळल्यासारखा होता.

दहीहंडी उत्सवातून बड्या आयोजकांची माघार, दहिहंडीच्या पारितोषिक रकमेत करण्यात आलेली घट, कोल्हापूर सांगली परिसरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रद्द झालेला दहिहंडी उत्सव यामुळे अनेक गोविंदा पथकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. संपूर्ण वर्षभर नजर लागलेल्या दहिहंडीच्या सणासाठी मेहनत घेतल्यानंतर यंदा पदरी घोर निराशाच पडल्याची प्रतिक्रिया गोविंदांची होती. यंदाच्या दहिहंडीच्या रकमेत विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पारितोषिकांचा वर्षाव होईल अशी अपेक्षा केली जात होती. मात्र गोविदांची ही आशा यंदा फोल ठरली. अनेक मंडळांनी दहिहंडी साजरा होण्यासाठीचा निधी हा पूरग्रस्थांना देण्याचे ठरवत दहिहंडीचे आयोजनच रद्द करत असल्याचे सांगितले.

वरळी, बोरिवली, गिरगाव, ठाणे अशा अनेक ठिकाणच्या आयोजकांनी यंदाच्या दहिहंडी उत्सवातून काढता पाय घेतला. त्यामुळे गोविंदा पथकांची यंदा अडचण झाली आहे. दहिहंडी समन्वय समितीने याआधीच पत्रकार परिषद घेत दहिहंडीच्या सणाचे आयोजन रद्द करू नका असे आवाहन केले आहे. जर गणेशोत्सव मंडळांकडून गणेशोत्सव साजरा होणार असेल तर दहिहंडी आयोजकांनीही साधेपणाने दहिहंडी करावी असे आवाहन समितीकडून करण्यात आले होते.

First Published on: August 25, 2019 1:25 AM
Exit mobile version