शीना बोरा हत्याकांडाची माहिती देवेन भारतींनी लपवली

शीना बोरा हत्याकांडाची माहिती देवेन भारतींनी लपवली

तत्कालीन पोलीस सहआयुक्त देवेन भारती यांनी शीना बोरा हत्याकांड प्रकरणाशी संबंधित आरोपी पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्याबाबत महत्त्वाची माहिती लपवली होती आणि हे क्लेशकारक होते, असा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या ‘लेट मी से इट नाऊ’ या पुस्तकात केला आहे. मारिया यांच्या या दाव्यावर एटीएसप्रमुख देवेन भारती यांनी प्रत्युत्तर देताना पुस्तकाला चांगली मार्केटिंग मिळावी यासाठी राकेश मारिया प्रयत्न करत असतील, असे म्हटले आहे.

राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात शीना बोरा हत्याकांड संदर्भात म्हटलंय की, पीटर मुखर्जीनं शीना गायब झाल्याची माहिती देवेन भारती यांना दिली होती. मात्र भारती यांनी ही माहिती आपल्यापासून दडवून ठेवली. याबाबत आपण त्यांना विचारलं असताही त्यांनी मौन बाळगणं पसंत केलं.

त्यामुळे कदाचित तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत चुकीची माहिती गेल्याचा आरोप मारिया यांनी केला आहे. त्याचबरोबर अहमद जावेद यांनीही एका ईदच्या कार्यक्रमाला पीटर मुखर्जीला आमंत्रित केलं होतं. त्याकडे मात्र कुणीही लक्ष दिलं नाही, असाही दावा त्यांनी या पुस्तकात केला आहे. शीनाच्या हत्येप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चुकीची माहिती मी देत असल्याचा संशय होता. त्यामुळे माझी बदली करण्यात आली आणि मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून जावेद अहमद यांची नेमणूक करण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारला त्यांचा उत्तराधिकारी म्हणून जावेद अहमद यांचे पीटर मुखर्जींशी असलेले संबंध माहीत होते, असे मारिया यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.

देवेन भारतींकडून इन्कार
राकेश मारिया यांनी पुस्तकाची विक्री आणि येत्या काळात वेब सिरीज बनवण्यासाठी तयार केलेला हा कंटेंट आहे. पोलीस दलातील एक व्यक्ती म्हणून चार्जशीट आणि रेकॉर्डवर असलेल्या गोष्टींवर मी विश्वास ठेवतो. या प्रकरणात तपास करणार्‍या संपूर्ण टीमला सगळ्या गोष्टी माहिती होत्या. कोणतीही गोष्टी लपवण्यात आलेली नाही. या संदर्भातले जे पेपर्स आहेत ते पडताळून पाहिल्यास सत्य आहे ते समोर दिसेल, असे देवेन भारती यांनी स्पष्ट केले.

दाऊदकडे होती कसाबची सुपारी
कसाब हा मुंबईवरील हल्ल्याचा एकमेव जिवंत साक्षीदार असल्याने जगभर नाचक्की होऊ नये म्हणून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांना कसाबला संपवायचे होते. त्यामुळेच कसाबला संपवण्यासाठी दाऊदला सुपारी देण्यात आली होती, असा दावाही या पुस्तकात मारिया यांनी केला आहे.

First Published on: February 19, 2020 5:45 AM
Exit mobile version