मेट्रो २ ए आणि ७ला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ८ दिवसांत १० लाखांहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास

मेट्रो २ ए आणि ७ला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ८ दिवसांत १० लाखांहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आल्यानंतर मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेल्या मेट्रो २ ए आणि ७ मधून प्रवास करण्यास प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. अवघ्या ८ दिवसांमध्ये तब्बल १० लाखांहून अधिक प्रवाशांनी या मेट्रोमधून प्रवास केल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ जानेवारी रोजी या दोन्ही मेट्रोचे लोकार्पण केले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी २० जानेवारीपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी मेट्रोच्या या दोन्ही मार्गिका खुल्या झाल्या. तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजेच ८ दिवसांच्या कालावधीत तब्बल १० लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. (Enthusiastic response from commuters to Metro 2A and 7 More than 1 million passengers traveled in 8 days)

२० हजारांहून अधिक मुंबई-१ कार्ड जारी

आजपर्यंत एकूण २० हजारांपेक्षा अधिक मुंबई-१ कार्ड जारी करण्यात आले आहेत. मुंबई-१ कार्ड हे प्रवासादरम्यान आवश्यक असलेल्या सर्व गरजांसाठी एक सामान्य मोबिलिटी कार्ड आहे. मुंबई-१ कार्ड प्रवाशांना अखंडपणे प्रवास करण्यास मदत करत असल्याने हे कार्ड प्रवाशांसाठी अधिक सोयीचे होत आहे. हे कार्ड भारतातील सर्व महानगरांमध्ये आणि मुंबईतील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी वापरले जाऊ शकते. या कार्डचा वापर करून शॉपिंगसोबत तसेच मेट्रो, बेस्ट बसची तिकिटे इत्यादी खरेदी करू शकतात. मेट्रोच्या तिकीट खिडक्यांवर हे कार्ड उपलब्ध आहे. मुंबई-१ कार्ड प्रत्येक सहलीवर ५-१० टक्के सूट देते. सोमवार ते शनिवार ५ टक्के, रविवार १० टक्के आणि राष्ट्रीय सुट्ट्या १० टक्के. मुंबई-१ कार्डप्रमाणेच ७५,७३९ वापरकर्त्यांनी मुंबई-१ मोबाईल अ‍ॅप्लिकेशन त्यांच्या डिव्हाईसवर डाऊनलोड केले आहे. या अ‍ॅप्लिकेशनद्वारे प्रवासी त्यांच्या ठरावीक अंतराच्या तिकिटांसाठी क्यूआर कोड तयार करू शकतात.

मुंबई-१ कार्ड आणि अ‍ॅप हे मुंबईकरांच्या अखंड प्रवासासाठी एक प्रगत पाऊल आहे. आता मेट्रो हे केवळ वाहतुकीचे साधन राहिले नसून ती एक नवी जीवनवाहिनी बनत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळ्यानंतर आठवडाभरात १ दशलक्षाहून अधिक मुंबईकरांनी मेट्रोने प्रवास केला. तसेच मेट्रो कार्यान्वित झाल्यापासून आतापर्यंत १ कोटी प्रवासी टप्पा ओलांडण्यात आला आहे. लोक आता त्यांच्या वाहतुकीसाठी खासगी वाहनांकडून पर्यावरणपूरक मेट्रोकडे वळत आहेत.
– एस. व्ही. आर श्रीनिवास, आयुक्त, महानगर

First Published on: January 29, 2023 5:30 AM
Exit mobile version