राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला असून या पार्श्वभूमीवर राज्यात ‘ब्रेक दी चैन’ या नव्या धोरणानुसार राज्यात निर्बंध कडक करण्यात आले आहेत. तसेच विकेंड लॉकडाऊन देखील लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. विकेंड लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून कोणीही व्यक्ती महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू शकणार नाही.
राज्य सरकारने लॉकडाऊनबाबत नियमावली जारी केली आहे. कोणतेही दुकान अत्यावश्यक वस्तू विकत असेल ते सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत कोरोनाच्या कडक निर्बंधांसह सुरू राहणार. जर ते विविध वस्तू ज्या अत्यावश्यक वस्तूंमध्ये येत नाहीत त्या विकत असतील तर ते दुकान बंद करण्यात येईल. विकेंड लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. कोणीही व्यक्ती महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू शकणार नाही. तसेच विकेंड लॉकडाऊनमध्ये एपीएमसी मार्केट सुरू राहणार आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाला नियमांचे उल्लंघन होत आहे, असे वाटले तर ते राज्य सरकारकडून परवानगी घेऊन मार्केट बंद करू शकतात.बांधकामासाठी वस्तू पुरवणारी दुकाने सुरू राहणार नाहीत.
तसेच, गॅरेज सुरू राहणार आहेत. गॅरेज ही वाहतूकदारांची गरज आहे. मात्र, ऑटोमोबाईल पार्ट दुकाने बंद राहणार. गॅरेज दुकानदार कोविड नियमांचे पालन करत आहे का? हे स्थानिक प्रशासन पाहणार आहे. अत्यावश्यक सेवेत कोण कोण येतात याची देखील माहिती राज्य सरकारने दिली आहे. केंद्र सरकार, पब्लिक सेक्टर अत्यावश्यक सेवेत येत नाहीत. मात्र, काही केंद्रीय कर्मचारी हे अत्यावश्यक शासकीय सेवेचा भाग असेल, तर त्यांना त्यात मोडले जाईल. जिथे जिथे लसीकरण न झालेल्या व्यक्तींसाठी आरटीपीसीआर चाचण्या बंधनकारक केल्या होत्या, तिथे आता पर्याय म्हणून रॅपिड अँटिजेन चाचण्या करू शकतात. १० एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू होणार. सर्व आपले सरकार सेवा केंद्र, पासपोर्ट सेवा, सेतू केंद्र आठवड्यात सकाळी ७ ते रात्री ८ सुरू राहू शकतात. वृत्तपत्रांमध्ये वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके, जर्नल्स यांचा देखील आवश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे.