पुण्यातील महत्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पातील असा असेल तिसरा टप्पा

पुण्यातील महत्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पातील असा असेल तिसरा टप्पा

पुण्यातील महत्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पातील तिसरा टप्पा हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( पीएमआरडी )आणि टाटा-सिमेन्स यांच्यात शनिवारी करार झाला. हा नवीन मार्ग २३. ३ किलोमीटरचा असणार आहे. सध्या शहर आणि परिसरात दोन मेट्रो मार्गाचे काम महामेट्रोकडून सुरु आहे.

नियोजित प्रकल्पाचे काम आगामी साडेतीन वर्षात पूर्ण होणार!

तिसऱ्या टप्प्यातील मेट्रो  प्रकल्पामुळे पुणेकरांना सक्षम वाहतूक व्यवस्था, सुविधाजनक प्रवास मिळेल आणि वेळेची बचत होणार आहे. हा नियोजित मेट्रोमार्ग एमआयडीसी, पीएमआरडीए, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रातून जाणार आहे. या नियोजित प्रकल्पाचे काम आगामी साडेतीन वर्षात पूर्ण करण्यात येणार असून मुख्य म्हणजे मेट्रो रेल धोरणांतर्गत सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून करण्यात येणारा देशातील हा पहिला प्रकल्प असणार आहे .

हिंजवडी ते शिवाजीनगर हे अंतर केवळ ४० मिनिटांच्या प्रवासात पूर्ण

या मेट्रो प्रकल्पामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर हे अंतर केवळ ४० मिनिटांच्या प्रवासात पूर्ण करता येणार आहे. या मार्गावर एकूण २३ स्थानके असणार आहेत,असे महानगर आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकारांना सांगितले. मुख्य म्हणजे या प्रकल्पामुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल, वायू प्रदूषणाचे प्रमाण कमी होणार आहे. तसेच मेट्रोचा मार्ग हा जमिनीखालून असणार नाही तर उन्नत असणार आहे. प्रकल्पासाठी एकूण गुंतवणूक ८, ३१३ कोटी इतकी असणार आहे आणि सुमारे दोन लाख नागरिक रोज या प्रकल्पाचा लाभ घेतील असे त्यांनी नमूद केले.

First Published on: September 21, 2019 3:55 PM
Exit mobile version