झोपडपट्टी वासियांसाठी खूशखबर, 517 प्रकल्पांना अभय योजना लागू

झोपडपट्टी वासियांसाठी खूशखबर, 517 प्रकल्पांना अभय योजना लागू

मुंबईत राहणाऱ्या झोपडपट्टी वासियांसाठी खूशखबर आहे. मुंबईतील 5 वर्षांहून अधिक काळ रखडलेले 517 प्रकल्प रद करण्यात आले आहेत. या प्रकल्पांची नवीन प्रक्रिया सुरू होणार असून या सर्व प्रकल्पांना अभय योजना लागू होणार आहेे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ज्या 517 प्रकल्पांना 5 वर्षांहून अधिक काळ होऊन गेला आहे आणि ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे काम झालेले नाही. अशा प्रकल्पांना रद्दबातल ठरविण्यात येत आहे. याची नवीन प्रक्रिया सुरु होईल. त्याचबरोबर ह्या सगळ्या प्रकल्पांना अभय योजना देखील लागू होईल. अभय योजनेचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे झोपडपट्टी विकासाला प्रचंड गती येईल. ह्या योजनेचा मुंबईतील 50000 कुटुंबाना फायदा होईल मुख्यमंत्री महोदयांनी सदर अभय योजनेला मान्यता दिली.

रेल्वे लगतच्या झोपड्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन होण्याची शक्यता आहे. आव्हाड यांनी मुंबईतील शिवगड येथील त्यांच्या निवासस्थानी  रेल्वे अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. बैठकीत रेल्वेलगतच्या झोपड्यांचे पुनर्वसन कुठे करायचे यावर चर्चा झाली.  यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनीही रेल्वे लगतच्या झोपड्यांचे पुनर्वसन करण्यास सकारात्मकता दर्शवली असल्याचे सांगितले जात आहे.

First Published on: May 6, 2022 6:54 PM
Exit mobile version