आयडॉलचे विद्यार्थी पुस्तकाविना; परीक्षेच्या तयारीची विद्यार्थ्यांना चिंता

आयडॉलचे विद्यार्थी पुस्तकाविना; परीक्षेच्या तयारीची विद्यार्थ्यांना चिंता

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलमध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेदरम्यान पुस्तके दिली जातात. मात्र प्रवेश घेऊन महिना उलटला तरी अद्याप विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध केली नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. आयडॉलमध्ये पुस्तकांसाठी वारंवार फेर्‍या मारल्यानंतरही विद्यार्थ्यांना पुस्तके नसल्याचे उत्तर प्रशासनाकडून देण्यात येते. त्यामुळे काही दिवसांत होणार्‍या पहिल्या सत्र परीक्षेची तयारी कशी करायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोेर पडला असून, परीक्षा आली पण पुस्तके नाहीत अशी गत विद्यार्थ्यांची झाली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल संस्थेमुळे नोकरी, व्यवसाय करणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळते. आयडॉलच्या २०२०-२१ वर्षाच्या जुलै सत्राच्या प्रवेश प्रक्रियेला १२ ऑक्टोबरला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मान्यता देण्यात आल्याने काही दिवसांतच आयडॉलकडून प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन आयडॉलकडून प्रवेश प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत राबवण्यात आली. यंदा प्रथमच आयडॉलमध्ये पदवी व पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रम सत्र पद्धतीने सुरू केले आहेत. प्रथम वर्ष बीए, बीकॉम व बीएस्सी आयटी हे पदवीस्तरावरील व एमए /एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी व एमसीए हे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी यंदापासून सत्र पद्धत राबवण्यात येणार आहे. २०२०-२१ वर्षाच्या जुलै सत्रासाठी ५६ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. पुढील काही दिवसांमध्ये सत्र परीक्षा सुरू होण्याची शक्यता असतानाही एकाही विद्यार्थ्याला अद्यापपर्यंत आयडॉलकडून एकही पुस्तक दिलेले नाही. तीन ते चार वेळा पुस्तकांची चौकशी करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध नसल्याचे उत्तर प्रशासनाकडून दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे. प्रवेश घेऊन महिन्यापेक्षा अधिक वेळ झाला तरी विद्यापीठाकडून पुस्तके देण्याबाबत चालढकल केली जात आहे. त्यामुळे आगामी सत्र परीक्षेची तयारी कशी करायची असा प्रश्न निर्माण झाल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन राज्य सरकारकडून केले जात असताना विद्यार्थ्यांना बेस्ट बसमधील गर्दीचा सामना करत कलिना कॅम्पस गाठावे लागत आहे. मात्र पुस्तकांबाबत विद्यापीठ प्रशासन ढिम्म असल्याचे दिसून येते. बस, रिक्षा करून येणार्‍या विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध न करून विद्यापीठ त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप युवासेना सिनेट सदस्य सुप्रिया करंडे यांनी केला.

 

यंदापासून सत्र पद्धत राबवण्यात येणार आहे. त्यामुळे नव्याने पुस्तके छपाईसाठी पाठवण्यात आली आहे. पुस्तके छपाईचे काम सुरू असून लवकरच विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील.
– विनोद माळाळे, उपकुलसचिव (जनसंपर्क), मुंबई विद्यापीठ

 

आयडॉल हे मुंबई विद्यापीठाचे सर्वात महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सोयीसुविधा पुरवणे विद्यापीठाचे कर्तव्य आहे. पुस्तके वेळेत छापून विद्यार्थ्यांना पुरवण्याकडे लक्ष देण्याऐवजी कुलगुरू स्वत:साठी महागड्या गाड्या खरेदी करण्याकडे अधिक लक्ष देत आहेत. विद्यापीठाची स्वत:ची प्रिटिंग प्रेस असताना पुस्तके छापण्यास कसा विलंब होतो
– डॉ. सुप्रिया करंडे, सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ
First Published on: January 12, 2021 6:49 PM
Exit mobile version