मुसळधार पावसात दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन

मुसळधार पावसात दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन

गणपती विसर्जन

श्री गणरायांचे आगमन झाल्यानंतर पंचपक्वानांसह लाडू, प्रसादाचा आस्वाद घेत आज, मंगळवारी दीड दिवसाच्या गणपतींनी निरोप घेतला. सकाळपासूनच पावसाने मुसळधार हजेरी लावली होती. परंतु या पावसाची तमा न बाळगता आपल्या लाडक्या गणरायाला ढोल ताशांच्या गजरात, वाजत-गाजत आणि भिजतच भक्तांनी निरोप दिला. समुद्राला मंगळवारी मोठी भरती असल्याने भाविकांना समुद्रावरच सुरुवातीलाच अडवून मूर्ती विसर्जन करण्यास भाग पाडले जात होते, तर अनेक भाविकांनी पर्यावरणाचा विचार करता कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जनावर भर दिला होता.

पालिकेकडून कृत्रिम तलावाची सुविधा 

श्री गणरायांचे आगमन मोठ्या धुमधामात आणि भक्तीमय वातावरणात सोमवारी घराघरांमध्ये तसेच सार्वजनिक मंडळांच्या मंडपांमध्ये झाले होते. प्रत्येकाने आपापल्या परिने आणि आपापल्या रितीरिवाजानुसार बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर मंगळवारी दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. गणेश मूर्तींचे विसर्जन करताना भक्तांची कुठेही गैरसोय होवू नये म्हणून महापालिकेच्यावतीने ३२ कृत्रिम तलावांसहीत ७२ विसर्जन स्थळांवर महापालिकेच्यावतीने सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

गणपती विसर्जन

पुढच्या वर्षी लवकर या…,

मुंबईत पहाटेपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासून मुसळधार पडणार्‍या पावसाची संततधार रात्रीपर्यंत कायमच होती. त्यामुळे ढोलताशांच्या गजरात बाप्पांची मिरवणूक काढता येत नसल्याने घराशेजारीच वाद्ये वाजवत नाचण्याचा आनंद लुटला गेला. त्यानंतर, पावसात भिजतच बाप्पांच्या मूर्तीची मिरवणूक काढत त्यांचे विसर्जन करण्यात आले. मात्र, त्या पावसातही ‘गणपती बाप्पा मोरया…, पुढच्या वर्षी लवकर या…’, असा जयघोष करत भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. त्यामुळे बेन्जो आणि ढोलताशे हे जागेवरच तासनतास वाजवले जात असल्याने पुढे पावसात या वाद्याविना मिरवणुका निघाल्याने अत्यंत सुरळीत आणि शिस्तबध्द पध्दतीने विसर्जन पार पडला.

या सर्व विसर्जन स्थळांवर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत २० सार्वजनिक गणेशमूर्ती, ९ हजार ७७ घरगुती गणेशमूर्ती याप्रकारे एकूण ९ हजार ९७ गणेशमूर्तींचे विर्सजन करण्यात आले. तर ३२ कृत्रिम तलावांमध्ये ३ सार्वजनिक आणि २३३८ घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. दुपारी दोनच्या सुमारास ४.९७ मीटर उंचीची भरती असल्याने संध्याकाळी भाविकांना समुद्राच्या किनार्‍यावरच अडवून जीवरक्षकांच्या मदतीने गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास सांगितले जात होते. एकाबाजुला मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे समुद्राला मोठी भरती, या वातावरणातच भाविकांना आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागला.

First Published on: September 3, 2019 9:48 PM
Exit mobile version