‘लॉकडाऊन हवे की नको?’ काय मत आहे नागरिकांचे; मनसेच्या सर्व्हेतून आले समोर

‘लॉकडाऊन हवे की नको?’ काय मत आहे नागरिकांचे; मनसेच्या सर्व्हेतून आले समोर

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोशल मीडियावर सर्वेक्षण घेतले होते. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी केलेल्या सर्व्हेचा कौल जाहीर करण्यात आला आहे. राज्यात कोरोनाच्या परिस्थितीमुळे गेल्या पाच महिन्यांपासून लॉकडाऊन कायम आहे. लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. लॉकडाऊन हटवावा, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे. त्यामुळे मनसेने यासंबंधी एक ऑनलाईन सर्व्हे केला असून त्यानुसार ७०.०३ टक्के लोकांनी लॉकडाऊन हटवावा, असे मत व्यक्त केले आहे. तर ८९.३ जणांनी लॉकडाऊनमुळे नोकरीवर परिणाम झाल्याचे मत नोंदवले आहे.

मनसेने समाजमाध्यमांवरून विविध मुद्द्यांवर सात दिवसांत नागरिकांचा कौल जाणून घेतला. यामध्ये ५४ हजार १७७ नागरिकांनी या सर्वेक्षणात विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांवर आपली मते नोंदवली.

सर्व्हेक्षणात या मुद्द्यावर नोंदवले मत

लॉकडाउनच्या काळात नोकऱ्या आणि उद्योगधंद्यांसाठी सरकारकडून योग्य मदत मिळाली नसल्याचे ८४.९ टक्के जणांनी सांगितले आहे. तर राज्य सरकारने शिक्षणाबद्दल घेतलेला निर्णय योग्य नसल्याचे ५२.४ टक्के जणांनी म्हटले आहे. तसेच शालेय शुल्काबाबत सरकारी धोरणांची अंमलबजावणी होत नसल्याचे ७४.३ टक्के जणांनी म्हटले आहे. तर लोकलसेवा पूर्ववत व्हावी असे ७३.५ टक्के लोकांचे मत आहे. लॉकडाऊनच्या काळात मदत वेळेत आणि योग्य मिळाली नसल्याचे ६०.२ टक्के जणांनी सांगितले. तर वीज बिलांबद्दल समाधानी नसल्याचे ९०.२ टक्के जण म्हणाले. लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरी थांबूनच काम करत होते, याबद्दल ६३.६ टक्के जणांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा –

WhatsApp Hijacking: व्हॉट्सअपद्वारे होतेय अनेकांची फसवणूक; आताच व्हा सावध

First Published on: August 25, 2020 11:57 AM
Exit mobile version